या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अल्ताफ अयुब शेख, अयुब रशीद शेख, शाहरुख यासेर कुरेशी आणि एक अज्ञात महिला अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. हे सर्वजण पीडित महिलेच्या सासरची मंडळी आहेत. मूलबाळ होत नसल्याच्या कारणातून त्यांनी विवाहितेला मारहाण करत तिच्या तोंडात विष टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना अंबड तालुक्यातील जामखेडा फाटा परिसरात घडली. विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरुन पती, सासरा, नंदई, सासू या चार जणांविरुध्द अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
नेमकं प्रकरण काय ?
अंबड तालुक्यातील जामखेड येथील एका विवाहितेचे दोन वर्षांपूर्वी पैठण तालुक्यातील ढोरकीन येथे विवाह झाला होता. दरम्यान, मूलबाळ होत नसल्याने सासरच्या व्यक्तींकडून तिला त्रास सुरु झाला होता. या घटनेची माहिती विवाहितेनं आपल्या कुटुंबीयांना सांगितली होती. यानंतर ती आपल्या माहेरी गेली होती.
घटनेच्या दिवशी माहेरच्या लोकांनी आपल्या मुलीला सासरच्या मंडळींच्या सोबत सोडलं. सासरची मंडळी चारचाकी वाहन घेऊन आले. या वाहनाने सर्वजण विवाहितेच्या सासरकडे जात होते. दरम्यान, जामखेड फाट्याजवळ गाडी थांबवून संशयितांनी विवाहितेला खाली उतरवले. नंतर चौघांनी शेतात ओढून नेले. या ठिकाणी पतीने विवाहितेला खाली पाडले, सासुने पाय धरले व सासऱ्याने तोंडात विष टाकण्याचा प्रयत्न केला. पण महिलेनं प्रसंगावधान दाखवत आरडाओरडा केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
