वाद नेमका कशामुळे पेटला?
मिळालेल्या माहितीनुसार, वादाची सुरुवात बकऱ्यांच्या व्यवहारातून झाली. मात्र, किरकोळ स्वरूपाचा असलेला हा वाद काही वेळातच विकोपाला गेला आणि दोन गट एकमेकांसमोर आले. बघता बघता ५०० ते ६०० जणांचा जमाव गोळा झाला. घोषणाबाजी करत दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार दगडफेक सुरू केली. या गोंधळात रस्त्यावरील गाड्यांना टार्गेट करण्यात आलं.
advertisement
दोघे गंभीर जखमी; संभाजीनगरला हलवलं
या भीषण दगडफेकीत ५ ते ६ जण जखमी झाले आहेत. यापैकी दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना प्राथमिक उपचारानंतर तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
राजकीय वळण आणि रात्रभर पोलिसांचा पहारा
सिल्लोडमध्ये राजकीय वातावरण आधीच तापलेलं असताना, या घटनेत शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणावात अधिकच भर पडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अंभई गावात धाव घेतली. रात्री १२ च्या सुमारास पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून १५ संशयितांना ताब्यात घेतले आहे.
गावात सध्या काय परिस्थिती?
सध्या अंभई गावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, गावात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
