सोलापूर : सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जत्रेच्या दिवशी शेतातलं काम सांगितल्याच्या रागातून 17 वर्षीय मुलाने आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना घडली आाहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील कासेगाव इथं ही घटना घडली आहे. हरिदास अशोक मोरे (वय १७) असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. हरिदास हा इयत्ता अकरावीत शिकत होता. रविवारी गावाची जत्रा होती. मात्र, उन्हाळ्यामुळे पिकांना पाणी द्यायचं असल्याने वडिलांनी त्याला शेतात जायला सांगितलं होतं. 'पिकांना पाणी देऊन जत्रेला ये,' असं त्यांनी मुलाला बजावलं होतं.
advertisement
पण, 'गावच्या जत्रेच्या दिवशी शेतात का जाऊ', असे म्हणत तो मित्राची दुचाकी घेऊन शेतात गेला. त्याचा राग पाहून कुटुंबीयांना संशय आला. त्यामुळे वडिलांनी त्याच्या भावाला थोड्या वेळानं शेतात पाठवलं. तोपर्यंत हरिदासने शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला होता. हे दृश्य पाहताच त्याच्या भावाने सत्तूरने दोरी कापून त्याला खाली उतरवलं आणि लगेचच वडिलांना बोलावून घेतलं.
शेजारी आणि गावकऱ्यांना याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हरिदासला खाली उतरवण्यात आलं. तातडीने त्याला सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हरिदासचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
