अहिल्यानगर येथील काही विद्यार्थी मित्र एकत्र येऊन अकलूज येथील वॉटर पार्कला सहलीसाठी निघाले होते. मात्र, जामखेड-कर्जत रस्त्यावरील शिंदेवाडी फाट्याजवळ त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वेगात असलेली कार रस्त्यावरून खाली जाऊन एक-दोन वेळा उलटली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून आतील सातही विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.
advertisement
कसा झाला अपघात?
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व विद्यार्थी नववी आणि दहावीत शिकणारे असून जीवलग मित्र होते. सुट्ट्या लागल्याने त्यांनी वॉटर पार्कला जाण्याचा बेत आखला होता. मात्र, प्रवासादरम्यान अचानक वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि घात झाला. कार उलटताना झालेल्या आवाजाने आजूबाजूच्या शेतातील आणि गावातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
अपघातात विद्यार्थी गंभीर जखमी
अपघातग्रस्त कारची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. स्थानिक ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता चेंदामेंदा झालेल्या कारमधून अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेने जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
रुग्णालयात मोठा गोंधळ
अपघाताची बातमी समजताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी आणि नातेवाईकांनी जामखेड रुग्णालयाकडे धाव घेतली. आपल्या मुलांची ही अवस्था पाहून पालकांनी मोठा टाहो फोडला होता. सध्या सर्व जखमींवर उपचार सुरू असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
