सुनेत्रा पवारांना मिळणार मोठी जबाबदारी
अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांकडे असलेली जवळपास सर्व खाती सुनेत्रा पवारांना मिळाली होती. केवळ अर्थ खातं सुनेत्रा पवारांना देण्यात आलं नव्हतं. भाजपनं हे खातं आपल्याकडेच ठेवलं. त्यामुळे दादा जाताच महायुतीत राष्ट्रवादी बॅकफुटला गेल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र आता मोठी माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना आणखी एक मोठी जबाबदारी मिळणार आहे.
advertisement
मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बैठक
मंत्रिमंडळातील विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या तीन ते चार महिन्यांत राज्याचे वित्त आणि नियोजन खाते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडे येण्याचे संकेत मिळत आहेत. अलीकडेच, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक पार पडली. याच बैठकीत अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडं देण्याचा निर्णय झाला आहे.
खरं तर, अजित पवार यांची राज्याच्या वित्त विभागावर जबरदस्त पकड होती. त्यांनी आतापर्यंत विक्रमी ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर हे महत्त्वाचे खाते कोणाकडे द्यावे, याबाबत पेच निर्माण झाला होता. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या सखोल चर्चेनंतर, तात्पुरत्या स्वरूपात हे खातं मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडेच ठेवावं, असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा एकदा हे खाते राष्ट्रवादीला सुपुर्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
सुनेत्रा पवार या राजकारणात नवख्या आहेत. त्यांना फारसा प्रशासकीय अनुभव नाही. अशात त्यांना अर्थखातं दिलं असतं, तर आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशानात त्यांना अर्थ संकल्प मांडावा लागला असता. अर्थ संकल्प मांडणं ही मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात फडणवीसांनी हे खातं स्वत:कडे ठेवलं. मात्र पुढील तीन ते चार महिन्यात हे खातं पुन्हा राष्ट्रवादीला दिलं जाणार आहे.
फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांची महत्त्वपूर्ण चर्चा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ खाते पुन्हा राष्ट्रवादीकडे सोपवण्याबाबत सुनेत्रा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. पुण्यात झालेल्या या चर्चेवेळी पार्थ पवार आणि जय पवार हेदेखील उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांनी नुकतीच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने, त्यांच्याकडेच हे महत्त्वाचे खाते सोपवून अजित पवारांचा वारसा पुढे नेण्याचा विचार महायुती सरकारमध्ये सुरू असल्याचे बोलले जात आहे.
