बांगलादेशात 'पॉवर शिफ्ट'! तारिक रहमान होणार नवे पंतप्रधान, खालिदा जियांच्या पक्ष पुन्हा सत्तेत
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने १३ व्या निवडणुकीत २०८ जागा जिंकून सत्ता मिळवली. तारिक रहमान केंद्रबिंदू ठरले. जुलाई चार्टरला ७२.९% पाठिंबा. अवामी लीग अनुपस्थित.
बांगलादेशात गुरुवारी पार पडलेल्या १३ व्या राष्ट्रीय संसदीय निवडणुकीत 'बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी'ने (BNP) निर्भेळ यश मिळवत सत्तेकडे कूच केली आहे. अनौपचारिक आकडेवारीनुसार, बीएनपीने २९९ पैकी २०८ हून अधिक जागा जिंकत 'मॅजिक फिगर' ओलांडली आहे. या विजयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून निर्वासित असलेले तारिक रहमान आता बांगलादेशच्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत.
तारिक रहमान यांचा दणदणीत विजय
बीएनपीचे नेते तारिक रहमान यांनी दोन जागांवरून निवडणूक लढवली होती आणि दोन्ही ठिकाणी त्यांनी बाजी मारली आहे. ढाका-१७ आणि बोगुरा-६ या दोन्ही मतदारसंघांतून त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यांच्या या विजयाने बीएनपी समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून, बांगलादेशच्या पंतप्रधानपदासाठी त्यांचे नाव आघाडीवर आहे.
जुलाई चार्टर आणि जनमत चाचणी
यावेळी केवळ संसदेसाठीच नव्हे, तर देशाच्या नवीन संविधानावर जनमत चाचणी देखील घेण्यात आली. सुरुवातीच्या कलानुसार, ७२.९% जनतेने या नव्या संविधानाला आणि सुधारणांना पाठिंबा दर्शवला आहे. यामध्ये पंतप्रधानांच्या कार्यकाळाची मर्यादा द्विगृही संसद आणि महिलांना वाढीव प्रतिनिधित्व यांसारख्या ३० महत्त्वाच्या बदलांचा समावेश आहे.
advertisement
अवामी लीगची अनुपस्थिती आणि शेख हसीनांचा आरोप
१९९० नंतर पहिल्यांदाच अवामी लीगचे 'नौका' हे चिन्ह निवडणुकीत दिसले नाही. निवडणूक आयोगाने पक्षाची नोंदणी रद्द केल्याने शेख हसीना यांचा पक्ष या प्रक्रियेतून बाहेर होता. भारतात आश्रयाला असलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी या निवडणुकीला 'एकतर्फी आणि दिखावा' असे संबोधले आहे. मात्र, ४७.९१% मतदानासह जनतेने या प्रक्रियेत सहभाग नोंदवत अंतरिम सरकारवर विश्वास दाखवला आहे.
advertisement
जमात-ए-इस्लामीची कामगिरी आणि तक्रारी
जमात-ए-इस्लामीच्या नेतृत्वाखालील ११ पक्षांच्या युतीला ६८ जागा मिळाल्या आहेत. मात्र, काही मतदारसंघांत गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. ढाका-१३ मतदारसंघातील उमेदवार मौलाना ममनुल हक यांनी मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे. बॅलेट पेपरच्या सदोष रचनेमुळे आपली हजारो मते रद्द झाल्याचे सांगत त्यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.
संयमित विजयात्सव: बीएनपीची 'शांती' राखण्याची साद
विजयाचा स्पष्ट कल दिसताच बीएनपीने आपल्या कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. "विजयाचा जल्लोष रस्त्यावर करण्याऐवजी, माजी पंतप्रधान खालिदा जिया यांच्या आरोग्यासाठी आणि देशाच्या शांततेसाठी शुक्रवारी नमाज अदा करा," असा संदेश पक्षाकडून देण्यात आला आहे. बांगलादेशातील हिंसाचाराचा इतिहास पाहता, बीएनपीचा हा पवित्रा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
Feb 13, 2026 7:25 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
बांगलादेशात 'पॉवर शिफ्ट'! तारिक रहमान होणार नवे पंतप्रधान, खालिदा जियांच्या पक्ष पुन्हा सत्तेत







