मैदानावरच कोसळले स्वप्न
दीपक वावळ हा तरुण गेल्या दोन वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करत होता. गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास, भर उन्हात त्याची १६०० मीटरची धावण्याची चाचणी झाली. १६०० मीटरचं अंतर त्याने जिद्दीने पूर्ण केलं, पण त्यानंतर त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्याला तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
advertisement
भर उन्हातील चाचणी जीवावर बेतली?
दीपकच्या मृत्यूने पोलीस भरतीच्या नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुपारी १ वाजता, जेव्हा उन्हाचा कडाका सर्वाधिक असतो, तेव्हा धावण्याची चाचणी का घेण्यात आली? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. दीपकच्या मृत्यूनंतर खडबडून जागे झालेल्या पोलीस प्रशासनाने आता मैदानी चाचणीच्या वेळेत बदल केला आहे. आता ही चाचणी सकाळी ९ च्या आत आणि सायंकाळी ५ नंतर घेतली जाणार आहे. मात्र, "ही खबरदारी दीपकचा बळी जाण्यापूर्वी का घेतली नाही?" अशी भावना उमेदवारांमधून व्यक्त होत आहे.
वावळ कुटुंबावर आभाळ फाटले
दीपकच्या निधनाची बातमी समजताच त्याच्या कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात एकच हंबरडा फोडला. ज्या मुलाच्या अंगावर खाकी वर्दी पाहण्याचे स्वप्न आई-वडिलांनी पाहिले होते, त्या मुलाचा मृतदेह पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली. "मी जिंकून येणार" हे त्याचे शेवटचे शब्द आठवून आईचा आक्रोश काळजाला घर पाडणारा होता.
उमेदवारांमध्ये संतापाची लाट
पोलीस भरतीसाठी येणारे बहुतांश तरुण हे ग्रामीण भागातील आणि गरीब कुटुंबातील असतात. मैदानी चाचणीसाठी तासनतास उन्हात उभे राहावे लागल्याने उमेदवारांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. दीपकच्या मृत्यूने या तक्रारींमधील गांभीर्य समोर आले आहे.
