धाराशिव : पावसाळ्यात सर्वत्र ओलावा व गारठा वाढतो. त्यामुळे वातदोषात वाढ होऊन शरीरात निरनिराळे आजार उत्पन्न होतात. या ऋतूत शरीराची पचनशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे खालेले अन्न पचत नाही व शरीर दुर्बल होते. त्यामुळे पावसाळ्यातील दूषित पाणी, वातविकार यापासून बचावासाठी लोकांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी, याबाबत आपण जाणून घेऊयात.
डॉ. लक्ष्मण बिराजदार यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, पावसाळ्यात कोरड्या व थंड वातावरणामुळे वात वाढतो. तर पित्ताचा संचय होतो. यावेळी वातावरणातील ओलसरपणा आणि शरीरातील आर्द्रता वाढते. यामुळे पचनशक्ती कमी होण्यासह अयोग्य पचन आणि पित्ताचा संचय होतो. या हंगामात ढगाळ आकाश आणि वातावरणातील पाण्याचे प्रमाण यामुळे औषधांच्या क्षमतेवरही परिणाम होतो.
advertisement
पावसाळ्यात शरीराची पचनशक्ती कमी होते. प्रतिकारशक्ती कमी होते आणि शक्ती कमी होते. कडू, उष्ण आणि तुरट गुणधर्म असलेले, बटाटे यांसारखे वात आणि पित्तामध्ये असंतुलन निर्माण करणारे पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो. हे पदार्थ आधीच कमकुवत झालेल्या पचनामुळे जठराची सूज आणि सूज यांसारखी लक्षणे वाढवू शकतात.
विशेष म्हणजे पावसाळ्यात पचायला जड पदार्थ, गोठवलेल्या वस्तू, आइस्क्रीम आणि तेलकट पदार्थ टाळणेही उत्तम आहे. त्याचबरोबर वात विकारांपासून दूर राहण्यासाठी लोकांनी संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. आरोग्याची काळजी घेतली तरच आपण वात विकारांपासून दूर राहू शकतो, असे मत डॉ. लक्ष्मण बिराजदार यांनी व्यक्त केले.