मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी निवडणुकीचा निकाल लावावा, अशी मागणी बहुतांशी राजकीय पक्षांकडून केली जात आहे. मात्र तूर्तास २१ डिसेंबरलाच हा निकाल लागणार, हे निश्चित झालं आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतीचा निकाल २१ डिसेंबरपूर्वी लागू शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे.
advertisement
मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हसन मुश्रीफ म्हणाले की, उच्च न्यायालयाचा जो निकाल आहे, त्या विरोधात सरकार लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात जाईल. त्यामुळे २१ डिसेंबरच्या आधीही हा निकाल लागू शकतो. पण सध्या निकालाची तारीख २१ डिसेंबर ठरली आहे. त्यामुळे मला वाटतंय की आपण पर्यटन करून यावं. तिरुपतीला जाऊन यावं किंवा थंड हवेच्या ठिकाणी जावून यावं. पुढच्या दोन दिवसात मतदारांचे आभार मानून पर्यटनाला जाऊन या, असं मुश्रीफ म्हणाले.
मतमोजणीची तारीख का बदलली?
नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार असल्याने फ्री अँण्ड फेअर इलेक्शन बाधित होईल, असा आरोप करण्यात येत होता. त्यामुळे निवडणुकीचा निकाल पुढे ढकलल्याची माहिती आहे. त्याचबरोबर कोणताही एक्झिट पोल मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर अर्ध्या तासाने दाखवण्यात येतो. पण कोर्टाने यावर देखील स्थगिती आणली आहे. एक्झिट पोल देखील २० तारखेला मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासाने दाखवावे, असं कोर्टाने म्हटलं आहे. याशिवाय राज्यात आता २० तारखेपर्यंत निवडणुकीची आचारसंहिता चालू राहणार आहे.
