फ्रीज आणि एसी ठरतात मुख्य कारण
स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ एयर वाइस मार्शल जीपी शर्मा यांच्या मते, आपण सुखसोयींसाठी वापरत असलेले फ्रीज आणि एसी आपल्याला थंडावा देत असले, तरी ते पृथ्वीला मात्र भाजून काढत आहेत. पूर्वी फ्रीजमधून निघणारा 'क्लोरोफ्लोरोकार्बन ओझोनचा थर कुरतडत होता. आता त्याची जागा हायड्रोफ्लोरोकार्बनने घेतली असली, तरी धोका टळलेला नाही. उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीत होणारी गळती आणि उत्सर्जित होणारे वायू उष्णतेला वातावरणातच कैद करून ठेवत आहेत, ज्यामुळे शहरांचं तापमान एखाद्या भट्टीसारखं वाढू लागलं आहे.
advertisement
बर्फ वितळतोय अन् उष्णता शोषली जातेय!
सर्वात मोठी धोक्याची घंटा आर्क्टिक प्रदेशातून वाजत आहे. २०५० पर्यंत रशिया, कॅनडा आणि स्कॅन्डिनेव्हियन देशांमधील तापमान चक्क ३.७६ अंशांनी वाढण्याची भीती आहे. इथला बर्फ वेगाने वितळल्यामुळे एक भयानक दुष्टचक्र सुरू झालंय. पूर्वी बर्फ सूर्यप्रकाश परावर्तित करायचा, पण आता उघडी पडलेली जमीन हा सूर्यप्रकाश शोषून घेत आहे. परिणामी, जमीन अधिक गरम होऊन उरलेला बर्फही वेगाने संपवत आहे.
निसर्गचक्र कोलमडलं
जीपी शर्मा यांच्या मते, ग्लोबल वॉर्मिंगचा हा विळखा इतका घट्ट झालाय की, मुक्या जिवांच्या वागणुकीतही बदल झाले आहेत. शास्त्रज्ञांना असं आढळलंय की, वाढत्या उष्णतेमुळे मधमाश्या आता पूर्वीपेक्षा अधिक आक्रमक आणि अस्वस्थ झाल्या आहेत. मागच्या काही काळापासून मधमाशांचे हल्ले देखील वाढले आहेत. कधीही न पाहिलेला पावसाळा, वेळेआधीच येणारा उन्हाळा आणि हिवाळ्यातील कडाका कमी होणं, ही हवामान बदलाची स्पष्ट लक्षणं आहेत. वाढतं काँक्रिटीकरण आणि झाडांची सर्रास होणारी कत्तल थांबवली नाही, तर आगामी २०२७ हे वर्ष मानवासाठी मोठी कसोटी ठरणार आहे.
