या संमेलनात महाराष्ट्रासह ओडिशा, तेलंगणा आदी चार राज्यांतील 60 हून अधिक शासकीय अधिकारी सहभागी झाले होते. मराठी भाषेला नुकताच अभिजात दर्जा मिळाल्यानंतर अशा प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन झाल्याने या संमेलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. परिसंवाद, कवी संमेलन, कथाकथन, चर्चासत्रे अशा विविध कार्यक्रमांद्वारे अधिकाऱ्यांनी आपल्या साहित्यिक अभिव्यक्तीचे दर्शन घडवले.
Mumbai : परदेशातील तंत्रज्ञान आता मुंबईच्या रस्त्यांवर, एमएमआरडीएने सुरू केला 'हा' मोठा उपक्रम
advertisement
संवाद पुणे, यशदा आणि पुणे महापालिका यांच्या सहकार्याने हे संमेलन आयोजित करण्यात आले. प्रशासकीय क्षेत्रातील अधिकारी नियमितपणे लेखन करत असले तरी त्यांच्या कामाच्या व्यापामुळे त्यांच्या साहित्याला व्यासपीठ मिळणे कठीण होते. ही उणीव भरून काढण्यासाठी मागील वर्षापासून या संमेलनाची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती आयोजक सुनील महाजन यांनी दिली. देशातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचे हे पहिलेच साहित्य संमेलन असून, अधिकाऱ्यांच्या संवेदनशील लेखनाला योग्य मंच देणे हा आमचा उद्देश आहे, असे ते म्हणाले.
संमेलनाचे अध्यक्ष तथा तेलंगणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक महेश भागवत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अधिकारी जीवनातील अनुभव साहित्याला कसे समृद्ध करतात, यावर भाष्य केले. अधिकाऱ्यांना पुस्तकांपेक्षा माणसे अधिक वाचायला मिळतात. विविध स्तरांतील लोकांच्या भावना, समस्या आणि संघर्ष जवळून पाहताना मनात साठलेले अनुभव लेखनातून व्यक्त होतात, असे त्यांनी सांगितले. गेली 26 वर्षे हैदराबादमध्ये कार्यरत असतानाही मराठी आणि मातीतली नाळ जपली असल्याचे त्यांनी नमूद केले.
मागील वर्षीचे संमेलनाध्यक्ष शेखर गायकवाड यांनी अधिकाऱ्यांनी लेखनाच्या माध्यमातून समाजाशी संवाद साधण्याची गरज व्यक्त केली. अधिकाऱ्यांचा जनतेशी सर्वाधिक संपर्क येतो. त्यामुळे त्यांच्या अनुभवातून समाजाचे वास्तव प्रभावीपणे मांडले जाऊ शकते, असे ते म्हणाले.
या संमेलनात सहभागी अधिकाऱ्यांच्या पुस्तकांना ‘वाङ्मय पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा आयोजकांनी केली. विविध राज्यांतील प्रतिनिधी, आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी एकत्र येऊन साहित्य, प्रशासन आणि समाज यांचा संगम घडवून आणत असल्याने हा उपक्रम चर्चेचा विषय ठरत आहे.
पुणे शहरात अनेक साहित्यिक मेळावे होत असले तरी अधिकाऱ्यांचे हे अनोखे संमेलन विशेष ठरले आहे. प्रशासकीय जबाबदाऱ्यांच्या कठोर चौकटीत काम करत असतानाही संवेदनशील लेखन जपणाऱ्या अधिकाऱ्यांना या माध्यमातून एक सशक्त व्यासपीठ मिळाले आहे. प्रशासन आणि साहित्य यांचे हे युनिक कॉम्बिनेशन पुणेकरांसाठी निश्चितच बौद्धिक मेजवानी ठरत आहे.





