वाशिम: वाशिममधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाशिमच्या समृद्धी महामार्गावरील वनोजाजवळ रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. पुण्यावरून जयस्वाल कुटुंब हे मारुती सुझुकी एर्टिगा कारने उमरेडकडे जात होतं. समृद्धी महामार्गावर वनोजाजवळ पोहोचले असताना जयस्वाल कुटुंबाच्या भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर कार महामार्गावरील संरक्षक कठडे तोडून बाहेर गेली. हा अपघात इतका भीषण होता की, महामार्गाच्या बाजूला लावलेले लोखंडी ग्रील कारमध्ये घुसले. या अपघातात कारचा चक्काचूर झाला. या अपघातात वैदेही जयस्वाल आणि माधुरी जयस्वाल यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर चालक चेतन जयस्वाल, राधेश्याम जयस्वाल आणि संगीता जयस्वाल हे तिघे गंभीर जखमी झाले आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी उपस्थितीत असलेल्या लोकांनी जखमींना कारमधून बाहेर काढलं. जखमींना तातडीने वाशिममधील खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे. तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
