नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, धारणी तालुक्यातील कंजोली येथील १५ ते २० नागरिक रविवारी मध्य प्रदेशातील देडतलई येथील आठवडी बाजारासाठी गेले होते. राणीगाव, सुसर्दा, शिवाझीरी, नारदु या मार्गे ते पिकअप वाहनाने बाजार आटपून सायंकाळच्या सुमारास परत येत होते. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास राणीगाव ते शिवाझीरी घाटातील 'घोडादेव बाबा' मंदिराजवळ असलेल्या धामणनाला परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
advertisement
रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे पिकअप अनियंत्रित होऊन थेट ५० फूट खोल दरीत कोसळली. दरी खोल असल्याने आणि गाडीत प्रवाशांची संख्या जास्त असल्याने हा अपघात अत्यंत भीषण ठरला.
मृतांचा आकडा वाढण्याची भीती
या अपघातात कंजोली गावातील ५ नागरिकांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका पाचारण करण्यात आली. जखमींना तातडीने धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
खड्ड्यांनी घेतला बळी?
स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. राणीगाव, सुसर्दा, शिवाझीरी या मार्गावरील रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यांमुळे पिकअप दरीत कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. या भागात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
घटनेचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत असून, मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण मेळघाट परिसरात शोककळा पसरली आहे.
