अर्जितसिंग चव्हाण, मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेझ असं हत्या झालेल्या तिघांची नावं आहेत. अर्जितसिंग चव्हाण हा नांदेडमधील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून ते 'सदा' नावाची गुन्हेगारी टोळी चालवतो. तर अरबाज आणि आवेझ हे 'साई लाला' टोळीचे सदस्य आहेत. शुक्रवारी मध्यरात्री साई लाला टोळीने अर्जितसिंग चव्हाणला मारण्यासाठी दबा धरला होता. त्यांनी तलवारी वार करत अर्जितला संपवलं देखील. मात्र त्यानंतर उफाळलेल्या टोळीयुद्धात अरबाज आणि आवेझचा देखील खून झाला.
advertisement
नांदेडमध्ये शुक्रवारी मध्यरात्री काय घडलं?
शुक्रवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास कॅनॉल रोड परिसरात दोन टोळ्यांमध्ये वाद झाला. अर्जितसिंग चव्हाण हा धुरंधर-२ चित्रपट पाहून अन्य दोघांसह दुचाकीने घराकडे जात होता. त्याच्यावर सय्यद आवेज सय्यद खलील, घनश्याम रेड्डी, मोहंमद अरबाज आणि इतर काही हल्लेखोरांनी तलवार आणि खंजीरने हल्ला केला. त्यात अर्जितसिंग चव्हाणचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या साथीदारांनी प्रतिकार केल्याने मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेझ हे दोघे गंभीर जखमी झाले. पोलिसांनी जखमींना तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल केले.
सरकारी रुग्णालयात रक्ताचा सडा
हल्लेखोरांना सरकारी रुग्णालयात दाखल केल्याची बाब मृत अर्जितसिंगचा धाकटा भाऊ राजेशला समजली. तो सरकारी रुग्णालयातील अपघात विभागात गेला. त्याने जखमी सय्यद आवेज सय्यद खलील आणि मोहम्मद अरबाज मोहम्मद फारुख यांना चाकूने वार करत मारले. त्यात या दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी ८ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दोन्ही टोळ्यांत वर्चस्वातून धुसफूस
काही महिन्यांपासून दोन्ही टोळ्यांमध्ये वर्चस्ववाद सुरू होता. यापूर्वीदेखील दोन्ही टोळ्यांचे सदस्य आमने सामने आले होते, परंतु त्यांच्यात खुनी हल्ला टळला होता. चव्हाण याच्यावर अत्यंत नियोजनपूर्वक हल्ला झाल्याने या कटात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.
