मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी चिटणीस चौकात हनुमान जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत अथर्व सहभागी झाला होता, मात्र गर्दीत तो अचानक दिसेनासा झाला. अथर्व हा इयत्ता आठवीचा विद्यार्थी होता. तो बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला, मात्र त्याचा कुठेही पत्ता लागला नाही.
शुक्रवारी सकाळपर्यंत अथर्वचा शोध न लागल्याने गिट्टीखदान परिसरातील नागरिक आक्रमक झाले. पोलीस तपासात विलंब होत असल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी परिसरात आंदोलन केले. जोपर्यंत मुलगा सापडत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली होती.
advertisement
कळमेश्वर परिसरात आढळला मृतदेह
एकीकडे शोधकार्य सुरू असतानाच, कळमेश्वर जवळील भरतवाडा परिसरात एका मुलाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ओळख पटवली असता, तो मृतदेह बेपत्ता अथर्वचाच असल्याचे निष्पन्न झाले.
अथर्वचा मृत्यू नक्की कसा झाला? घातपात की अन्य काही कारण? याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली जात आहे.
