नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मयुरी मेंढे असं आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचं नाव आहे. तिचा विवाह झाल्यानंतर पतीसोबत तिचे वारंवार खटके उडत होते. घरगुती कलहामुळे वैतागलेली मयुरी महिनाभरापूर्वीच आपल्या माहेरी आली होती. दरम्यान, शनिवारी घरातील इतर सदस्य बाहेर गेलेले असताना मयुरीने राहत्या घरी पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
चिठ्ठीतून व्यक्त केली हताश भावना
advertisement
मयुरीने आत्महत्येपूर्वी एक भावनिक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. यात तिने आपल्या पतीवर असलेले अफाट प्रेम व्यक्त केले आहे. मृत्यूपूर्वी तिने पतीला फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचेही समजते. मात्र, पतीने फोन न उचलल्याने तिने हताश होऊन हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. "मी तुमच्यावर खूप प्रेम करते," असं लिहित तिने मनातील व्यथा चिठ्ठीत मांडल्या आहेत.
मयुरीच्या निधनानंतर माहेरच्या नातेवाईकांनी पतीच्या त्रासाला कंटाळूनच तिने हे पाऊल उचलल्याचा दावा केला आहे. पतीकडून तिला सतत मानसिक त्रास दिला जात होता, असा गंभीर आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. मुलीच्या मृत्यूनंतर कोराडी परिसरात शोककळा पसरली असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
घटनेची माहिती मिळताच कोराडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी घटनास्थळावरून मयुरीने लिहिलेली ती भावनिक चिठ्ठी जप्त केली असून, ती पुराव्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तसेच मयुरीच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार तपासही केला जात आहे.
