विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता
नायगाव तालुक्यातील बेंद्री येथील संतोष माधवराव बेंद्रीकर हा व्यक्ती आपल्या शेजारी राहणाऱ्या एका विवाहित महिलेचा मागील अनेक दिवसांपासून विनयभंग करत होता. या जाचाला कंटाळून पीडित महिलेने 22 डिसेंबर रोजी आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याचा राग मनात धरून आरोपीने अत्यंत टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवलं. त्याने आपल्या कुटुंबीयांच्या मदतीने पीडितेच्या पतीला लक्ष्य करण्याचे षडयंत्र रचलं.
advertisement
29 डिसेंबर रोजी पहाटे 5:30 वाजता...
29 डिसेंबर रोजी पहाटे 5:30 वाजता सगळे साखरझोपेत असताना पीडितेचे पती गोठ्यात काम करत होते, त्यावेळी आरोपींनी त्यांना गाठलं अन् यावेळी झालेल्या वादातून आरोपींनी त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत पेटवून दिलं. या जीवघेण्या हल्ल्यात पिडितेचा पती 50 टक्क्यांहून अधिक भाजला असून त्याच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुख्य आरोपीसह तिघांना अटक
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सध्या गावातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणाव कायम आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिलंय.
