समोर आलेल्या माहितीनुसार, रासेगाव ग्रामपंचायतीत उपसरपंच विशाल वारुळे यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. हा ठराव नामंजूर करून देण्यासाठी सरपंच मंदा बेंडकुळे आणि त्यांचे पती विठ्ठल बेंडकुळे यांनी वारुळे यांच्याकडे 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार विशाल वारुळे यांनी ही मागणी धुडकावून लावत याबाबत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
advertisement
तक्रारदाराने काय म्हटलंय?
विशाल वारुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मी जनतेतून निवडून आलेला उपसरपंच असून यापूर्वी एकही रुपया न देता पद मिळवले आहे. मात्र अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी माझ्याकडे 50 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. मी नकार दिल्यानंतर ते 15 हजार रुपयांवर तयार झाले. याबाबतचे सर्व पुरावे गोळा करून मी एसीबीकडे तक्रार दाखल केली.
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल
तक्रारीची दखल घेत एसीबीने सापळा रचला. ठरलेल्या योजनेनुसार, तक्रारदाराने सरपंच आणि त्यांच्या पतीला 15 हजार रुपये दिले असता एसीबीच्या पथकाने तात्काळ छापा टाकत दोघांनाही रंगेहात पकडले. अटकेनंतर दोघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघातच हा प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, स्थानिक प्रशासन आणि ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एसीबीच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
