पेठेनगर- वडाळा परिसरातून अद्यापही बससेवा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना, नोकरदारांना आणि ज्येष्ठ नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. लवकरात लवकर या मार्गावर बससेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पेठेनगर रस्त्यावर विश्वास सोसायटी, महारुद्र कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, देवेंद्र सोसायटी, आत्मविश्वास सोसायटी, जिल्हा परिषद परिसर, सप्तश्रृंगी सोसायटी, अरूणोदय सोसायटी, जाखडीनगरसह अनेक मोठमोठ्या सोसायट्या आणि कॉलनी आहेत. यामधील नागरिकांना बससेवा नसल्यामुळे प्रवासासाठी त्रास होत आहे. बस नसल्यामुळे त्यांना ऑटो रिक्षेचा पर्याय वापरावा लागत आहे.
advertisement
बस पेक्षा ऑटोरिक्षामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. पेठेनगर रस्त्यावरील वेगवेगळ्या सोसायटींतील अनेक विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिक दररोज प्रवास करत असतात. परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता प्रवाशांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. स्थानिक प्रशासनाने आणि बस कंपनीने या मार्गावर कोणतीही दिरंगाई न करता तात्काळ 'सिटीलिंक' बससेवा सुरू करावी, अशी भावना स्थानिक रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे. पेठनगर रस्त्यावरील प्रवाशांना प्रवासासाठी बसचा पर्याय नसल्यामुळे प्रवाशांना मुंबई महामार्गापर्यंत चालत चालत जावे लागते. रिक्षा सुद्धा खर्चिक असल्यामुळे रिक्षा सुद्धा नागरिक वापरत नाहीत.
पेठनगर परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरामध्ये 'सिटीलिंक' बससेवा नसल्यामुळे नागरिकांना नाईलाजाने रिक्षाचा पर्याय निवडावा लागत आहे. किंवा पायपीट करत पुढचा बसस्टॉप गाठावा लागत आहे. या मार्गांवरून मोठ्या प्रमाणावर प्रवाशी चालत जात असतात तरी सुद्धा बस थांबवली जात नाही. जरीही शहरातील बससेवेने प्रवाशांवर दुर्लक्ष केले असले तरीही किमान सिटीलिंक बससेवेने तरीही प्रवाशांवर लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
