नेमकी घटना कशी घडली?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास ही कार दिंडोरीमार्गे जात असताना शिवाजीनगर भागात अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटलं. नियंत्रण सुटलेली कार थेट रस्त्याशेजारील राजू राजे यांच्या शेतातील विहिरीत जाऊन कोसळली. विहीर उघडी असल्याने कार थेट खोल पाण्यात जाऊन कोसळली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता.
advertisement
बचाव कार्यात मोठे अडथळे
रात्रीची वेळ, विहिरीतील खोल पाणी आणि चिखल यामुळे बचाव कार्यात मोठ्या अडचणी येत होत्या. दाट अंधारामुळे मृतदेह शोधणे आणि कार बाहेर काढण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. अखेर, रात्री उशिरा क्रेन आणि हायड्रा मशीन पाचारण करण्यात आलं. या यंत्रांच्या मदतीने अथक प्रयत्नानंतर कार विहिरीतून बाहेर काढण्यात यश आलं. मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास सर्व ९ ही मृतदेह बाहेर काढण्यात आले.
एकाच कुटुंबातील ५ जण दगावले
या भीषण अपघातात मृत्यू झालेले सर्व जण दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील ५ सदस्यांचा समावेश असून सुनील दत्तू दरगोडे, राखी सुनील दरगोडे, उषा अनिल दरगोडे, श्रद्धा अनिल दरगोडे आणि श्रावणी अनिल दरगोडे अशी मृतांची नावं आहेत. यातील इतर ४ मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस प्रशासनाकडून अधिक तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, इंदोरे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
