बाल्कनीतून पुलावर मारता येईल उडी!
इंदोरा ते दिघोरी या मार्गावर सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. मात्र, लाल इमली चौक परिसरात या पुलाची रचना पाहिल्यावर कोणाचेही डोळे विस्फारतील. येथील काही घरांच्या बाल्कनी आणि खिडक्यांना हा पूल अगदी घासून गेला आहे. काही घरांची शेड तर थेट पुलाच्या कठड्याला टेकली आहेत.
अशोक चौकानंतर आता लाल इमलीची बारी
advertisement
नागपुरात असा प्रकार घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अशोक चौकातही उड्डाणपूल लोकांच्या घराच्या बाल्कनीत शिरल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. त्यावेळीही मोठी टीका झाली होती, पण त्यातून प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. आता लाल इमली चौकातही त्याच चुकीची पुनरावृत्ती झाली आहे. घराचे बांधकाम आधी की पुलाचे नियोजन नंतर? अशा तांत्रिक पेचात नागरिक अडकले असून, या 'डेंजरस' डिझाईनमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
अपघाताचे 'ओपन इनव्हिटेशन'
हा उड्डाणपूल घरांच्या इतका जवळ आहे की, एखादे वाहन अनियंत्रित झाल्यास ते थेट घरात शिरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. तसेच, पुलावरून जाणाऱ्या वाहनांचा आवाज, प्रदूषण आणि सुरक्षिततेचा प्रश्न यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. चोरट्यांसाठीही हा पूल घरांत शिरण्याचा सोपा मार्ग ठरू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
शहराचा विस्तार आणि ट्रॅफिक कमी करण्यासाठी उड्डाणपुलांची गरज आहेच, मात्र लोकांच्या घरांवरून किंवा खिडक्यांतून पूल नेण्याचा हा 'नागपुरी पॅटर्न' नक्की कोणाच्या फायद्याचा आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
