एका अज्ञात वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे एका हसतखेळत्या तरुणाचा जीव गेल्याने वाटोडे कुटुंबासह संपूर्ण वाडी दमई गावावर शोककळा पसरली. वाडी दमई येथील रहिवासी असलेला अमोल सुधाकर वाटोडे ४ एप्रिल रोजी परभणीत आपल्या मावसभावाच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी मोठ्या आनंदाने आला होता. लग्नाची खरेदी, भावाचं कौतुक आणि नातेवाईकांच्या भेटीगाठी यात तो रमला होता.
रात्री अकराच्या सुमारास भीषण अपघात
advertisement
रात्री ११च्या सुमारास कारेगाव रोडवरील नवीन डी-मार्ट इमारतीसमोरून तो पायी जात होता. याच वेळी काळाने घाला घातला. भरधाव येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने अमोलला जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. अमोलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला तातडीने परभणीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकीकडे घरी लग्नाची लगबग सुरू होती, तर दुसरीकडे अमोल मृत्यूशी झुंज देत होता. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. उपचारादरम्यान अमोलची ही झुंज अपयशी ठरली आणि त्याने जगाचा निरोप घेतला.
लग्नघरातला आनंद क्षणात दु:खात बदलला
भरलेल्या घरात अचानक शांतता पसरली. ज्या हातांनी भावाला हळद लावली होती, त्याच हातांवर आता अंत्यविधीची वेळ आली. अवघ्या ३० वर्षांच्या अमोलच्या जाण्याने वाटोडे कुटुंबाचा आधार हरपला. भावावर काळाने घाला घातल्यामुळे नवरदेवही पुरता कोलमडून गेला. कुटुंबियांचा मोठा आधार हरपला. वडील सुधाकर वाटोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवा मोंढा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
जिंतूर औंढा महामार्गावरही भीषण अपघात
ओव्हरटेक करण्याच्या नादात रविवारी दुपारी जिंतूर आणि औंढा नागनाथ महामार्गावर भीषण अपघात झाला. कार चालक दुचाकीला ओव्हरटेक करून पुढे आला मात्र समोरून येणाऱ्या दुचाकीला त्याने जोरदार धडक दिली. दुचाकीवरील तरुण 20 फूट लांब फेकला गेला. या भीषण अपघातात वसमत शहरातील दोघांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. अपघात इतका भीषण होता की, दुचाकी आणि कार या दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा पूर्ण चक्काचूर झाला.
