परभणीत मराठा समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केली. यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी येत्या चोवीस तासांत प्रशासनाने सर्व हल्लेखोर समाजकंटकांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. तसेच ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी असल्याचे म्हटले आहे.
दलित अस्मितेच्या प्रतिकाची तोडफोड ही पहिलीच घटना नाही
advertisement
प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतिकाची अशी तोडफोड किंवा विटंबना होण्याची ही पहिलीच घटना नाही. वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रथम घटनास्थळी पोहोचले. त्यांनी केलेल्या निषेध आणि निदर्शनामुळे पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला असून एका समाजकंटकाला अटक केली आहे. तरीही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका. शांतता राखा, असे आवाहन आंबेडकर यांनी आंबेडकरी समाजाला केले.
परभणीतील आंदोलनाला हिंसक वळण
परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. तिथे भारतीय संविधानाची प्रतिकृती करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास एका अज्ञाताने संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली. ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे काही तासांतच परभणी शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली. संतप्त झालेल्या आंबेडकरी अनुयायांनी मंगळवारी संध्याकाळी रास्ता रोको, रेल रोको आंदोलन केले. तर, आज परभणी बंदची हाक देण्यात आली. या बंदला हिंसक वळण लागले.
