राज्यातला शेतकरी कसा कर्जाच्या बोझ्याखाली दाबला जातोय, हे वारंवार समोर येतंय. पण, हाच शेतकरी कसा खासगी सावकारीच्या जाळ्यात अडकून मरणयातना सोसतोय, याचं वास्तवच विधानसभेत मांडलं गेलं. खासगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी राज्यातील तब्बल 19 शेतकऱ्यांनी आपली किडनी विकल्याचा धक्कादायक दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी केला आहे. खासगी सावकारांच्या जाचामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर किती भीषण परिस्थिती ओढावली आहे, याचं वास्तव कमी प्रमाणात का होईना सरकारनंही मान्य केल्याचं दिसतंय.
advertisement
कोलकाता व्हाया कंबोडिया!
एका एजंटनं या शेतकऱ्याला कोलकात्याला नेलं. त्यानंतर कंबोडिया देशात नेऊन त्याची किडनी काढण्यात आली. ही किडनी आठ लाखाला विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. खासगी सावकारांचं शेतकऱ्याची शेती, घरादारातील सामान हडपल्यानंतर समाधान झालं नाही म्हणून त्यांनी थेट किडनी विकायला लावली. याच प्रकरणाच्या संदर्भानं बुधवारी विधानसभेत चर्चा झाली. यावेळी भाजप आमदार अतुल भातखळकरांनी मकोका अंतर्गत कारवाईची मागणी केली.
किडनी रॅकेटमध्ये पद्मश्री प्राप्त डॉक्टरांचा समावेश
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याच्या पुढे जात, गृहविभागाच्या अहवालाचा संदर्भ देत, चंद्रपूर, अहिल्यानगर आणि सोलापूर अशा विविध जिल्ह्यातून सावकारांनी कर्जवसुलीसाठी 19 शेतकऱ्यांच्या किडनी विकायला भाग पाडल्याचा दावा केला. या किडनी रॅकेटमध्ये दिल्लीतील पद्मश्री मिळालेल्या डॉक्टरचाही समावेश असल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवारांनी केला.
विजय वडेट्टीवारांच्या या दाव्यानं एकच खळबळ उडाली. पण, गृहराज्यमंत्र्यांनी तात्काळ यावर स्पष्टीकरण देत वडेट्टीवारांना दावा फेटाळून लावला. 19 नव्हे तर 9 जणांची आणि त्यातही एकाच शेतकऱ्याची किडनी विकल्याची माहिती गृहराज्यमंत्र्यांनी दिली.
विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून नेहमीप्रमाणे राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. पण, ज्या शेतकऱ्यानं हे सगळं भोगलं, तो सरकारकडून न्यायाची अपेक्षा व्यक्त करतोय. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीनं घायाळ शेतकऱ्याला मदतीच्या नावानं आश्वासनांची खैरात मिळते. ज्याच्या आशेमुळं तो मरत नाही. पण, कर्ज देणारे त्याला सुखानं जगूही देत नाही, हेच आज शेतकऱ्याचं वास्तव आहे. हे वास्तव स्विकारून सरकारनं शेतकऱ्यांना मदत करायला हवी आणि खासगी सावकारांची मुजोरी जिरवायला हवी. नाहीतर आज एक किडनी काढणारे खासगी सावकार उद्या शेतकऱ्याच्या शरिराचा लिलाव करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत. एक असो की, 19 शेतकऱ्यांना किडनी विकायला भाग पाडलं जातंय, हेच भीषण आहे.
