भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या अकस्मात निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकरिता भाजपकडून अक्षय कर्डिले रिंगणात आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपने प्रयत्न केले. परंतु मतदारसंघातील जनतेचे मत लढण्याचे आहे, असे सांगून प्राजक्त तनपुरे यांनी सुरुवातीपासूनच वातावरण तापवले. अगदी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी अर्ज भरणार की नाही, याबाबत संभ्रम कायम ठेवला. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या दोन तीन बैठका संपन्न होऊन त्यात तनपुरे यांचे नाव अंतिम केले. परंतु सोमवारी कर्डिले यांचा अर्ज भरण्यासाठी आलेले भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री विखे पाटील यांनी थेट तनपुरे यांची भेट घेतली. त्यानंतर तनपुरे यांची भूमिका बदलल्याची चर्चा आहे.
advertisement
मोकाटे विरुद्ध कर्डिले अशी थेट लढत
तनपुरे यांच्या माघारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृतरित्या गोविंद मोकाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे स्थानिक नेते अर्ज भरताना उपस्थित होते. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे मोकाटे यांचा अर्ज भरताना तनपुरे गैरहजर होते. राहुरी मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तनपुरे यांच्या भेटी घेतल्यानंतर चर्चांना उधाण आले होते. मात्र, ऐनवेळी प्राजक्ता तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता निवडणुकीतून माघार घेतली आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून गोविंद मोकाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता राहुरीत थेट लढत भाजपाचे अक्षय कर्डिले आणि राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे यांच्यात होणार आहे.
तनपुरे यांना भाजपकडून मोठे आश्वासन, त्यामुळेच माघार?
भाजप नेते भेटल्यानंतर तनपुरे यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांच्याविषयी विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. तनपुरे यांना भाजपकडून मोठे आश्वासन देण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विनंती केल्यामुळे मी माघार घेतली, असे कारण तनपुरे यांनी दिले. या कारणावरून त्यांची भाजपसोबत असलेली जवळीक अधोरेखित होते.
