कडक उन्हाचा कांदा शेतीवर परिणाम, पिकाचे कसे कराल संरक्षण? सोप्या टिप्सचा Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
वाढत्या उष्णतेमुळे कांदा पिकाची सड, आकार कमी होणे आणि टिकवण क्षमतेवर परिणाम होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे कांदा पिकाची योग्य काळजी घेणे आवश्यक ठरते.
अमरावती : सध्या उन्हाळ्याचे कडक तापमान वाढत असून त्याचा थेट परिणाम शेतीवर होताना दिसत आहे. विशेषतः कांदा पिकासाठी हा काळ अतिशय महत्त्वाचा आणि तितकाच धोकादायक मानला जातो. वाढत्या उष्णतेमुळे कांदा पिकाची सड, आकार कमी होणे आणि टिकवण क्षमतेवर परिणाम होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे कांदा पिकाची योग्य काळजी घेणे आवश्यक ठरते. अशा परिस्थितीत अमरावती येथील प्रयोगशील शेतकरी रवींद्र मेटकर यांनी कांदा पिकाच्या संरक्षणासाठी एक सोपा आणि प्रभावी उपाय सुचवला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या प्रयोगशील कामाची दखल घेत त्यांची निवड ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये चर्चेसाठी झाली आहे, ही शेतकऱ्यांसाठी अभिमानाची बाब आहे.
रवींद्र मेटकर यांच्या मते, कांदा पीक पाकळीवर (म्हणजे काढणीपूर्व अवस्थेत) आले की त्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. याच काळात उन्हाचा तीव्र परिणाम होऊन कांद्यामध्ये सड सुरू होण्याची शक्यता अधिक असते. मात्र, योग्य वेळी योग्य उपाय केल्यास कांद्याची गुणवत्ता आणि साईज दोन्ही वाढवता येतात.
यासाठी त्यांनी सांगितलेला उपाय अत्यंत सोपा आहे. बांबूच्या सहाय्याने कांद्याची पाल आणि गड्डा (कांदा) यांच्या मधील भागातून हलका मोड द्यावा. म्हणजेच कांद्याची पाल झोपवावी. या प्रक्रियेमुळे कांद्याला आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रकारे होतो आणि गड्ड्याची वाढ अधिक चांगली होते.
advertisement
या उपायाचे अनेक फायदे आहेत. कांद्याची साईज वाढते, टिकवण क्षमता सुधारते आणि सड होण्याचे प्रमाण कमी होते. याशिवाय, कांद्याची पाल झोपवल्यानंतर शेतातील आजूबाजूचे गवतही खाली पडते, ज्यामुळे त्याची वाढ कमी होते आणि तणनियंत्रणही आपोआप साध्य होते.
उन्हाळ्यात कांदा पिकाचे नुकसान टाळण्यासाठी अशा सोप्या आणि खर्चिक नसलेल्या उपाययोजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. योग्य वेळी केलेली ही काळजी उत्पादन वाढवण्यासोबतच बाजारात चांगला दर मिळवून देण्यास मदत करू शकते. कांद्याची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी आणि उत्पादन सुधारण्यासाठी अशा प्रकारचे प्रयोगशील मार्गदर्शन शेतकऱ्यांनी अवलंबल्यास निश्चितच फायदा होईल, असेही रवींद्र मेटकर यांनी सांगितले आहे.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
Apr 06, 2026 3:51 PM IST








