भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीने रायगडमध्ये एकत्रित निवडणुका लढवल्या. निवडणुकीत ५९ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने १६ जागा तर भाजपने १५ जागा जिंकल्या. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने सर्वाधिक २१ जागा जिंकल्या. शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी ९ जागांची गरज आहे. हेच लक्षात घेऊन आपापले जिल्हा परिषद सदस्य भाजप-राष्ट्रवादीने सुरक्षित स्थळी हलवले. शिवसेनेकडून उदय सामंत यांनी रायगड जिल्हा परिषदेवर अध्यक्ष बसविण्यासाठी प्रयत्न केले खरे पण त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. तटकरे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सत्ता स्थापनेची समीकरणे आणि वाटाघाटीवर यशस्वी चर्चा झाल्याची माहिती आहे.
advertisement
सर्वाधिक जागा जिंकूनही शिंदेसेनेला विरोधी बाकावर बसण्याची वेळ?
सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याची रणनीती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आखली. भाजप राष्ट्रवादीच्या या खेळीमुळे सर्वाधिक जागा जिंकूनही शिंदेसेनेला विरोधी बाकावर बसण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.
अध्यक्षपद भाजपकडे, उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे
भारतीय जनता पक्षाकडे अध्यक्षपद जाणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपाध्यक्षपद देण्याचे दोन्ही पक्षांमध्ये ठरले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. उर्वरित सत्ता वाटपाची समीकरणे पुढच्या काही दिवसांत ठरतील, असेही सूत्रांनी सांगितले.
अध्यक्षपदानंतर विधानसभेवर सुद्धा भाजप आमदार निवडून येणार- आस्वाद पाटील
रायगड जिल्हा परिषदेवर अध्यक्ष पदाच्या निवडीबाबत आता वेग आला आहे. रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि भाजप नेते आस्वाद पाटील यांनी अलिबाग येथील एका कार्यक्रमात मोठ विधान केले आहे. ज्या प्रमाणे रायगड जिल्हा परिषदेवर भाजपाचा अध्यक्ष बसला, त्याप्रमाणे विधानसभेवर सुद्धा येणाऱ्या काळात आपला आमदार असेल असे विधान करत शिंदे शिवसेनेला आव्हान दिले. भाजप राष्ट्रवादीच्या या खेळीवर शिंदे शिवसेनेला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. किती दिवस आपण दुसऱ्यांबरोबर चालणार आणि मार्केटिंग करणार असे म्हणत येणाऱ्या काळात आपली मतदानाची टक्केवारी सुद्धा वाढली पाहिजे, असे आस्वाद पाटील म्हणाले.
