राज ठाकरे काय म्हणाले?
राज्याचे मुख्यंमत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे प्रकरण आम्हीच शोधून काढलं आणि याचा तपास आम्हीच सुरू केला आहे. जर तुम्हाला याचं श्रेय घ्यायचे असेल तर मग हे प्रकरण घडत होते आणि तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशयाची सुई फिरत आहे, तेव्हा हे सगळे घडत असताना याचा कुठेच सुगावा का लागला नाही म्हणून दोषी धरायचे का? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.
advertisement
कुणाचे पंख छाटण्यासाठी कॅप्टन फाईल्स उघडली?
तसेच माझ्या तर कानावर असे पण येते आहे की कोणाच्या तरी महत्वकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जात आहे, असा संशय देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
याचा अर्थ असा की एकदा का समोरच्याने शरणागती पत्करली आणि काही काळ तरी कुरघोड्या थांबवल्या की हे सगळं प्रकरण बासनात गुंडाळलं जाईल, अशी भीती राज ठाकरे यांनी बोलून दाखवली आहे.
राज ठाकरेंना एकनाथ शिंदे यांचं नाव घ्यायचंय?
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना २०२२ साली पहिल्यांदा अशोक खरात याच्याकडे गेले. नियोजित सर्व बैठका रद्द करून एकनाथ शिंदे शिर्डीला गेले. साईबाबांचं दर्शन घेतल्यावर त्यांनी आपल्या सोबतच्या गाड्यांचा ताफा सोडून ते सिन्नरच्या दिशेने मार्गस्थ झाले. तिथे मिरगावात जाऊन त्यांनी अशोक खरातने उभारलेल्या ईशानेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले तसेच काही पूजाविधीही केले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी कॅप्टन अशोक खरात याला भविष्यवाणीसाठी आपला हात दाखविल्याची चर्चा राज्यभरात झाली. एकनाथ शिंदे यांनी राजकीय भविष्यासाठी एका ज्योतिषाला हात दाखवला, या चर्चांनी त्यांच्यावर मोठी टीकाही झाली. तेव्हापासून शिवसेनेचे अनेक राजकीय नेते अशोक खरात याच्याकडे जाऊ लागले. भेटीत अनेक पूजाविधी होत असत, असे सांगितले जात आहे. या सगळ्या काळात खरातकडून महिलांचे शोषण सुरूच होते, असेही सूत्रांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी संशय व्यक्त केल्याप्रमाणे कोणाच्या महत्वकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राज ठाकरे यांच्या पोस्टनंतर एकनाथ शिंदे यांचे पंख छाटण्यासाठीच खरात फाईल्स ओपन झाली आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
