मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा राजापूर तालुक्यातील माडबन आणि विजयदुर्ग परिसराच्या खोल समुद्रात २० नाँटीकल मैल मधून स्फोटासारखे आवाज येत होते. प्रचंड मोठे आवाज असल्याने परिसरात भीतीच वातावरण पसरलं होतं. समुद्रात नेमकं काय घडतंय? याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. आता समुद्रातील स्फोटाच्या आवाजाचे गूढ उकलण्यात तटरक्षक आणि पोलीस दलाला यश आलं आहे.
advertisement
खोल समुद्रातून जाणाऱ्या टग म्हणजेच मोठ्या बोटीवरून सिग्नल पिस्टलमधून फायर केल्याने हे आवाज आले होते, अशी माहिती पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली आहे. रात्रीपासून पोलीस यंत्रणेकडून गूढ आवाजासंदर्भात शोध सुरू होता. यानंतर अखेर पोलिसांनी याबाबत खुलासा केला आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
खरं तर, यापूर्वी रत्नागिरीसह विविध समुद्र किनाऱ्यांवर गुन्हेगारी कृत्याच्या घटना घडल्या आहेत. अनेकदा समुद्रामार्गे तस्करी किंवा इतर क्रिमीनल अॅक्टीव्हीटी घडल्या आहेत. याच घटनांच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारे समुद्रातून स्फोटासारखे आवाज आल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. मात्र ते आवाज सिग्नल पिस्टलचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे समुद्र किनारी भागात राहणाऱ्या लोकांचा जीव भांड्यात पडला.
