विजय वाघमारे, प्रतिनिधी जळगाव: जळगाव शहरालगत असलेल्या निमखेडी शिवारात एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने डोक्यावर आणि मानेवर वार करून ही हत्या केली. हत्येनंतर आरोपींनी तरुणाचा मृतदेह जखमी अवस्थेत टाकून पळ काढला होता. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तरुणाला रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तरुणाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
advertisement
सागर साहेबराव सोनवणे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. मारेकऱ्यांनी निर्घृणपणे हत्या केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री निमखेडी शिवारात सागर सोनवणे याला काही अज्ञात व्यक्तींनी गाठले आणि त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी सागरच्या डोक्यावर धारदार शस्त्रांनी जोरदार वार केले. ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. हल्ला केल्यानंतर मारेकऱ्यांनी त्याला त्याच अवस्थेत सोडून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच सागरचे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गंभीर जखमी झालेल्या सागरला तातडीने उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
डॉक्टरांनी सागरला मृत घोषित करताच, जिल्हा रुग्णालयात उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी मोठा आक्रोश केला. या तरुणाच्या क्रूर हत्येमुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या खून प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. रात्रीच पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. अन्य संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. सध्या तरी या खुनाचे नेमकं कारण काय आहे, हे स्पष्ट झालेले नाही. प्रेमसंबंधातून, वैयक्तिक वादातून की अन्य कोणत्या गुन्हेगारी कारणातून ही हत्या झाली, याचा तपास पोलीस करत आहेत.
