सातारा जिल्हा परिषदेत संख्याबळ नसूनही भाजपने रडीचा डाव खेळत आपला अध्यक्ष बसवला. त्यासाठी साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांनी मदत केली, असा गंभीर आरोप शंभूराज देसाई यांनी केला. देसाई यांच्या आरोपांनंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतली. भाजप जर असेच लागणार असेल तर आम्ही राजीनामे देतो, अशी टोकाची भूमिका शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतली. शिवसेना भाजपच्या संघर्षाची राज्यात चर्चा होत असताना रोहित पवार यांनी सेनेची कड घेऊन भाजपला डिवचले आहे.
advertisement
रोहित पवार काय म्हणाले?
एका जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी गृहखात्याची अफाट ताकद वापरण्यापेक्षा ती अजितदादांच्या अनैसर्गिक पद्धतीने झालेल्या मृत्यूच्या चौकशीसाठी वापरली तर विरोधक असूनही आम्हीही या निर्णयाचं मनापासून स्वागतच केलं असतं, पण त्याऐवजी साताऱ्यात गृहखात्याच्या आशीर्वादाने लोकशाहीचा ढवळ्यादिवसा खून पडतोय, मंत्र्याशीही झटापट करुन त्यांना दुखापत केली जाते आणि याविरोधात खुद्द मंत्र्यांनाच विधिमंडळापुढं आंदोलनही करावं लागतंय.
यावरुन भाजपाने कधीकाळी विचारलेला प्रश्न आज नव्याने त्यांनाच विचारण्याची गरज आहे... कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? पण काहीही असो, सत्तेसाठी सख्या मित्रालाही गिळायला भाजप मागंपुढं बघत नाही, हे यानिमित्ताने शिवसेना शिंदे गटाला आणि अजितदादा गटाला कळलंच असेल.. असे रोहित पवार म्हणाले.
शिवसेना मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे नाराजी
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे पडसाद अधिवेशनात उमटल्यानंतर शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत शिवसेना मंत्री आणि आमदारांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांची तक्रार केली. तसेच भाजपच्या राजकारणावर देखील नाराजी व्यक्त केली.
