कराड : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी निवडणूक पार पडली आहे. पण काही ठिकाणी आश्चर्यकारक आणि धक्कादायक निकाल लागले आहे. साताऱ्यातील कराड पंचायत समिती निवडणुकीत फेर मतमोजणीत शिवसेना उमेदवाराचा विजय झाला आहे. अवघ्या १ मताने शिवसेनेनं विजय मिळवला आहे. फेर मतमोजणीत भाजपचा पराभव सहन करावा लागला आहे.
कराड तालुक्यात तांबवे पंचायत समिती गणासाठी फेर मतमोजणीत पार पडली. यामध्ये शिवसेनेचे दिनेश कुंभार एका मतांनी विजयी झाले आहेत. एका मताचा फरक असल्याने शिवसेना आणि भाजपाचा फेर मतमोजणी अर्ज केला होता. शिवसेना आणि भाजप अटीतटीची लढत झाली त्यामध्ये शिवसेनेने बाजी मारली. याठिकाणी पोस्टल मते पुन्हा मोजण्यात आली. शिवसेना उमेदवार दिनेश कुंभार यांना 5 हजार 286 तर भाजप उमेदवार तानाजी देवकर यांना 5 हजार 285 मतं पडली. शिवसेना उमेदवार एका मताने विजयी झाल्याचं घोषित होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
advertisement
सातारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येणार?
दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपने सर्वाधिक 27 जागा मिळवल्या असल्या तरी सुद्धा भाजपला बहुमताचा 33 हा आकडा गाठता आलेला नाही. यामुळे आता सत्ता कोण स्थापन करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीने 20 जागा जिंकल्या आहेत तर शिवसेनेने एकूण 15 जागा जिंकल्या आहेत काँग्रेस एक आणि अपक्ष उमेदवारांनी दोन जागा जिंकल्या आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादीच्या 20 आणि शिवसेनेच्या 15 या जागा एकत्र केल्या तर 33 हा बहुमताचा आकडा पार करून राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून साताऱ्यात जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करू शकते. शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद जाधव पाटील यांच्यामध्ये अशा पद्धतीचं बोलणं सुरू असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे. यामुळे जयकुमार गोरे यांना धक्का देत मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई हे सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात, असं सुद्धा बोलल जातंय.
गेल्या काही दिवसांपासून मंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील आणि शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांना थेट आव्हान दिल्याचे सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. मकरंद पाटील यांच्या मतदारसंघात जाऊन जोरदार प्रचार करताना सुद्धा जयकुमार गोरे पाहायला मिळाले होते. तर शंभूराज देसाई यांना थेट आव्हान देत पालकमंत्र्यांना घाबरू नका, असं सुद्धा त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं. यामुळे भाजपला बाजूला ठेवत मकरंद पाटील आणि शंभुराज देसाई हे सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात, असं सुद्धा विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे.
