सोलापूर : राज्यातील सर्वच पक्ष विधानसभा निडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार यावरून तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांकडून वेगवेगळी विधाने केली जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याऐवजी एकत्रित निवडणूक लढणं हे महत्त्वाचं असल्याचं म्हटलं जातंय. काँग्रेस नेत्यांनी आम्हीच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवू असा दावा केला जातोय. तर ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे हेच आश्वासक चेहरा असल्याचं सांगण्यात येत आहे.
advertisement
काँग्रेस नेत्यांकडून आम्हीच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री ठरवू असं म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत स्पष्ट भूमिका मांडण्यात आलेली नाही. एकत्रित निवडणूक लढायची असल्याचं म्हणत प्रश्नाला बगल दिली होती. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्या नावाचा आग्रह केला जात आहे. ठाकरे गटाचे नेतेही उघडपणे महाविकास आघाडीत दुसरा कोणता चेहरा वाटत असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जाहीर करावा असं म्हटलंय. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी थेट काँग्रेसला आव्हान दिल्यानं आता महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून जुंपण्याची शक्यता निर्माण झालीय.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं की, काँग्रेसने सांगावं आक्षेप की आहे, उद्धव ठाकरे चालत नाही हे जाहीर करावं. उद्धव ठाकरे एक आश्वासक चेहरा महाराष्ट्रसह देशाला आहे. त्यांच्या मागे जनमत आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचारात उद्धव ठाकरेंना बोलवावे लागले होते. उद्धव ठाकरे यांच्यासारख्या प्रभावी नेते महाराष्ट्रात काय महाविकास आघाडी किंवा महायुतीकडे पण नाही.
