नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, हा टँकर अतिशय घातक केमिकलची वाहतूक करत होता. जगबुडी नदीच्या पुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर भीषण रित्या पलटी झाला. अपघाताचा फटका इतका जोरात होता की, टँकरला मोठी गळती लागली. टँकरमधील हजारो लिटर इथेनॉल थेट पुलाखालून वाहणाऱ्या जगबुडी नदीत सांडू लागले. यामुळे नदीचे पाणी पांढरट झाले असून संपूर्ण परिसरात रसायनाचा उग्र वास पसरला आहे.
advertisement
पाणीपुरवठा योजनांना मोठा धोका
ही घटना ज्या ठिकाणी घडली, त्याच परिसरात खेड शहरासह आजूबाजूच्या अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नळपाणी योजनांच्या जॅकवेल विहिरी आहेत. नदीच्या पात्रात थेट केमिकल मिसळल्याने हे पाणी आता पिण्यायोग्य राहिलेले नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक गावांचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्यात आला आहे. नदीचे पाणी दूषित झाल्याने जलचरांनाही मोठा धोका निर्माण झाला आहे.
प्रशासनाची युद्धपातळीवर धाव
घटनेची भीषणता पाहून खेड पोलीस आणि अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. टँकरमधील केमिकल ज्वलनशील असल्याने मोठी आग लागण्याची भीती व्यक्त होत होती, त्यामुळे वाहतूक काही काळ रोखण्यात आली. टँकरची ही गळती थांबवण्यासाठी लोटे एमआयडीसीमधून तज्ज्ञांच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे.
परिसरात उग्र वास, नागरिकांमध्ये भीती
केमिकलच्या उग्र वासामुळे पुलावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना आणि नदीकाठच्या रहिवाशांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे समजते. प्रशासनाने नागरिकांना नदीपात्राजवळ न जाण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गळती रोखण्याचे काम अद्याप सुरू असून, टँकर सुरक्षितरीत्या बाजूला काढण्यासाठी क्रेनची मदत घेतली जात आहे.
