श्री क्षेत्र तारकेश्वर गडाचे दुसरे महंत आदिनाथ शास्त्री महाराज शास्त्री यांनी वार केल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते रक्तबंबाळ अवस्थेत होते. त्यांची ही स्थिती का झाली? हे कुणाच्याही लक्षात येत नव्हते. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला का? अशी चर्चा जनमाणसांत रंगली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. आता या घटनेला 1 आठवडा लोटल्यानंतर स्वतः महाराजांनी आपण जखमी का झालो? याचे कारण स्वत:च समोर येत सांगितले आहे.
advertisement
डिस्चार्जनंतर आदिनाथ महाराज काय म्हणाले?
आदिनाथ महाराज म्हणाले, मला सात दिवसानंतर डिस्चार्ज मिळाला असून सध्या मी सुखरुप आहे. मी गेलो होतो पण यमाच्या जबड्यातून डॉक्टरांनी खेचून आणलं आहे. डॉक्टरांबद्दल काय बोलावे त्यांच्यासाठी शब्द नाहीत माझ्याकडे... असे डॉक्टर पुन्हा होणे नाही. डॉ. तन्वर हे अहिल्यानगरचे भूषण आहे. जो काही जननेंद्रियाचा त्याग झाला, तो मी स्वतःहून करून घेतला, कोणाचाही काहीच त्रास नाही, कोणीही माझी काळजी करू नका, मी आनंदात आहे. सर्वांनी सुखी राहा...
नेमकं काय घडलं होतं?
15 मार्च रोजी तारकेश्वर गडावरील स्वतःच्या खोलीत महाराज रक्ताच्या थारोळ्यात आढळले होते. त्यांनी स्वतःच्या गुप्तांगावर शस्त्राने वार केल्याचे समोर आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. अत्यंत गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेमागे काही दबाव होता का? की हे कृत्य कोणत्या धार्मिक भावनेतून केले गेले? असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. मात्र, महाराजांनी कोणावरही आरोप न केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
गडावर गर्दी न करण्याचे आवाहन
शस्त्रक्रिया झाल्यानंकर सात दिवसातच डॉक्टरांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
महाराजांची प्रकृती आता स्थिर असली तरी त्यांना संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे डॉक्टरांनी पुढील आठवडाभर कोणत्याही भक्ताने महाराजांची भेट घेऊ नये, असे कळकळीचे आवाहन केले आहे. त्यांना विश्रांतीची अत्यंत गरज असून, प्रकृती पूर्णपणे सुधारेपर्यंत गडावर गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनानेही केले आहे.
