हॉटेल व्यावसायिक, छोट्या खानावळी चालवणारे तसेच काही घरगुती वापरासाठीही लोक कुंभारवाड्यात येऊन या मिनी भट्ट्यांची खरेदी करत असल्याचे दिसून येत आहे. पारंपरिक मातीची भांडी, माठ, घागरी तयार करणारे कुंभार कारागीर आता वाढत्या मागणीमुळे भट्टी तयार करण्याकडे वळले आहेत. त्यामुळे या भागात कामाला वेग आला असून अनेक कारागिरांना रोजगाराची नवी संधीही मिळत आहे.
advertisement
इतरांच्या शेतात मजुरी केली अन् घेतला निर्णय, भुईमुग शेतीतून नशीब पालटलं, 6 लाख रुपयांचा नफा
गेल्या सुमारे 40 वर्षांपासून हा व्यवसाय करत असलेल्या कारागिरांच्या मते, तंदूर भट्टी आणि मिनी भट्टीला सध्या मोठी मागणी आहे. काही वर्षांपूर्वी छोटी भट्टी साधारण 1500 रुपयांना विकली जात होती. मात्र सध्या तिची किंमत वाढून सुमारे 3500 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मोठ्या आकाराच्या भट्ट्या पूर्वी 4500 ते 5500 रुपयांदरम्यान मिळत होत्या, परंतु आता त्यांची किंमत 6 ते 7 हजार रुपयांपर्यंत गेली आहे. कच्चा माल महागल्यामुळे आणि मागणी वाढल्यामुळे दरांमध्ये सुमारे 20 ते 30 टक्क्यांची वाढ झाल्याचे कारागीर सांगतात.
या भट्ट्या तयार करण्यासाठी लागणारी माती शिरूर परिसरातून आणली जाते. त्यामध्ये मातीसोबत मीठ, काच, वाळू आणि सिमेंट यांचा वापर करून मजबूत आणि टिकाऊ भट्टी तयार केली जाते. ग्राहकांच्या गरजेनुसार छोट्या, मध्यम आणि मोठ्या अशा तीन साईझमध्ये या भट्ट्या उपलब्ध असतात. त्यापैकी छोटी आणि मध्यम आकाराच्या भट्ट्यांना सर्वाधिक मागणी असल्याचे कारागीर सांगतात.
मच्छिंद्र शिर्के यांनी सांगितले की, मागील वर्षी याच काळात या भट्ट्यांना फारशी मागणी नव्हती. मात्र यावर्षी गॅस टंचाईमुळे परिस्थिती बदलली असून ग्राहक मोठ्या प्रमाणात येत आहेत. पुढील काळात गॅसचा पुरवठा सुरळीत झाला नाही, तर या भट्ट्यांची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, चौथी पिढी म्हणून हा व्यवसाय पुढे नेत असलेल्या प्रभाकर शिंदे यांनी सांगितले की, सध्या माठ आणि इतर पारंपरिक वस्तूंचे उत्पादन काही प्रमाणात कमी करून भट्टी तयार करण्यावर अधिक भर दिला जात आहे. वाढत्या ग्राहकसंख्येमुळे रोज साधारण 8 ते 10 भट्ट्यांची विक्री होत आहे. त्यामुळे कुंभारवाड्यातील कारागिरांना या नव्या मागणीमुळे दिलासा मिळत असून पारंपरिक व्यवसायाला नवे बळ मिळत आहे.





