अत्याधुनिक बसेस
अलीकडेच त्यांनी, “आता केवळ गाव तिथे एसटी नाही, तर आदिवासी पाडा तिथे एसटी,” असा ठाम निर्धार करत त्यांनी विकासाचा नवा अध्याय सुरू केल्याची घोषणा केली. एसटी महामंडळाकडून 9 मीटर लांबीच्या, 35 आसनी बसेस खरेदी केल्या आहेत. त्यांनी तब्बल 100 अत्याधुनिक मिडी बसेस खरेदी करत या बसेसना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ असे प्रेरणादायी नाव दिले आहे. अरुंद रस्ते, तीव्र चढ- उतार आणि वळणा वळणाच्या घाट रस्त्यांवरून सहज धावू शकतील, अशा या बसेस खास करून आदिवासी पाड्यांसाठीच नियोजित आहेत.
advertisement
आदिवासी पाड्यात बस सेवा
आज भारत देश स्वातंत्र्य होऊन 77 वर्षे झाली आहेत. इतक्या वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या अनेक खेड्या पाड्यात आणि कानाकोपऱ्यात एसटी पोहोचली. आज तब्बल 93% लोकसंख्या एसटी सेवेशी जोडलेली आहे. तरीही सह्याद्री आणि मेळघाटच्या दऱ्याखोऱ्यातील अनेक पाडे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूरच राहिले होते. मोठ्या बसेसला तिथे केव्हा प्रवेश शक्य नव्हता; त्यामुळे शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासाठी आदिवासी बांधवांना अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. आता मात्र ही पायपीट थांबणार आहे. ही केवळ बससेवा नाही, तर सामाजिक समावेशकतेचा सेतू आहे.
शिक्षणासाठी शहरात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, आरोग्य सेवेसाठी धाव घेणार्या मातांसाठी आणि रोजगाराच्या शोधात निघालेल्या तरुणांसाठी ही ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ बससेवा एक प्रकारे आशेचा किरण ठरणार आहे. मंत्री सरनाईक यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की, “दुर्गम भागातील आपला आदिवासी समाज आता एसटीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राशी जोडला जाईल. विकासाची गंगा प्रत्येक पाड्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा निर्धार आहे.” ‘लालपरी’च्या चाकांमध्ये आता केवळ प्रवास नाही, तर परिवर्तनाची गती दडलेली आहे. डोंगर- दऱ्यांतील शांत पाड्यांवर लवकरच एसटीचा हॉर्न घुमेल आणि त्या आवाजात विकास, समता आणि संधींची नवी पहाट दडलेली असेल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
