कराड तालुक्यातील तांबवे येथील बाळासाहेब दादा पाटील यांचे चिरंजीव विक्रम पाटील यांचा विवाह आज पुणे जिल्ह्यातील उरुळीकांचन येथे प्रकाश अर्जुन राऊळ (रा. वेर्ले, जि. सिंधुदुर्ग) यांची कन्या आदिती यांच्याशी संपन्न होत आहे. लग्नाची वेळ दुपारी ठरलेली असतानाही विक्रम यांनी सकाळी सर्वप्रथम मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.
लग्नाची तयारी, पाहुण्यांची लगबग आणि वेळेची घाई असतानाही आधी मतदान, मग लग्न या भूमिकेतून त्यांनी कर्तव्याला प्राधान्य दिले. त्यांच्या समवेत कुटुंबीय व मित्रमंडळीही मतदानासाठी उपस्थित होती. मतदान केल्यानंतर थेट लग्नस्थळासाठी ते पुण्याकडे रवाना झाले.
advertisement
मतदान केंद्रावर पारंपरिक पोशाखातील नवरदेव पाहून उपस्थित मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. अनेकांनी त्यांचे कौतुक करत छायाचित्रेही काढली. मतदान हा लोकशाहीचा उत्सव असून प्रत्येकाने त्यात सहभागी व्हावे, असा संदेश त्यांच्या कृतीतून दिला गेल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
