पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोलीच्या आरमोरी इथं ही धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका तरुणाला ब्लॅकमेल करून पैसे उकळले. 4 लाख रुपये दिल्यावरही भूक थांबली नाही, तर 15 लाख रुपयांसाठी तरुणाला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार गडचिरोलीच्या आरमोरी शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेना उबाठा गटाचे आरमोरी विधानसभा संघटक राजू अंबानी, नितीन जोथ आणि मुलीवर या तिघांवर खंडणी आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद केला आहे.
advertisement
काय घडलं नेमकं?
आरमोरी येथील कृष्णा लाड या 26 वर्षीय तरुणाचे शहरातीलच 23 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, तिच्या आयुष्यात नव्या प्रियकराची एंट्री झाल्याने त्यांच्यात खटके उडू लागले. यात राजू अंबानी, नितीन जोथ या दोघांनी मध्यस्थीचा आव आणला. "तुझे चॅटिंग आमच्याकडे आहे, ते व्हायरल करून तुझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करू", अशी धमकी देत या तिघांनी तरुणाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. बदनामीच्या भीतीने तरुणाने वेळोवेळी त्यांना सुमारे 3 ते 4 लाख रुपये दिले. मात्र एवढ्यावरच ते न थांबता आणखी 15 लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास "तू मरुन जा, नाही तर आम्ही तुला मारु", अशी धमकीही दिली.
13 मार्च रोजी पीडित कृष्णा लाड ब्रह्मपुरी मार्गाने जात असताना आरोपींनी त्याला वाटेतच गाठले. तिथे त्याला बेदम मारहाण केली आणि बळजबरीने त्याच्या तोंडात फवारणीचे विषारी कीटकनाशक ओतले आणि आरोपींनी तिथून पळ काढला. गेल्या पंधरा दिवसांपासून बेशुद्ध अवस्थेत तरुण नागपुरातील रुग्णालया मृत्यूशी झुंज देत होता. आज 4 एप्रिल रोजी तो शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी त्याचा बयान नोंदवले असता ही धक्कादायक घटना समोर आली. पोलिसांनी त्याच्या बयानावरून तिन्ही आरोपींवर गुन्ह्या दाखल केला आहे. पुढील तपास आरमोरी पोलीस करत आहे.
