पुणे, सातारा, सांगलीत पावसाचे सावट
हवामान खात्याच्या ताज्या मॉडेलनुसार, अरबी समुद्रातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे पश्चिम महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. १७ फेब्रुवारीच्या रात्रीपासून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची दाट शक्यता आहे. तसेच अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातही पावसाचा शिडकावा पाहायला मिळू शकतो.
advertisement
विदर्भ-मराठवाड्यात काय स्थिती?
विदर्भ आणि मराठवाड्यात सध्या पावसाची शक्यता कमी असली, तरी उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात १ ते २ अंशांची घसरण झाली आहे. मात्र, ही थंडी आता फार काळ टिकणार नाही. १८ फेब्रुवारीनंतर या भागातही ढगाळ वातावरण निर्माण होऊन तापमानाचा पारा पुन्हा चढायला सुरुवात होईल.
तमिळनाडू आणि श्रीलंकेत हाय अलर्ट
महाराष्ट्रात केवळ पावसाचा शिडकावा अपेक्षित असताना, दक्षिण भारतात मात्र निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळू शकते. श्रीलंकेवरून येणारे कमी दाबाचे क्षेत्र तमिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. यामुळे कन्याकुमारी, मदुराई आणि तंजावर या भागात १७ आणि १८ फेब्रुवारीला 'अतिवृष्टी' होण्याचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळ सदृश स्थितीमुळे दक्षिण भारतासह महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरही वाऱ्याचा वेग वाढणार आहे.
