काय आहे ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’?
‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, १ एप्रिल २०१६ रोजी तिची सुरुवात करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या संगोपन व शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे.
कोणाला मिळतो लाभ?
या योजनेचा लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दिला जातो. सध्या ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ७.५ लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. यापूर्वी ही मर्यादा फक्त १ लाख रुपये होती, मात्र नंतर ती वाढवण्यात आली आहे.
advertisement
कुटुंब नियोजनाची अट
या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या जन्मानंतर पालकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. तसेच एका कुटुंबातील केवळ दोन मुलींनाच या योजनेचा लाभ दिला जातो.
आर्थिक मदतीचे स्वरूप
या योजनेअंतर्गत मुलीच्या नावावर एकरकमी ५०,००० रुपये जमा केले जातात. याशिवाय मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत दिली जाते. तसेच मुलीच्या नावावर १ लाख रुपयांचा अपघात विमाही उपलब्ध करून दिला जातो.
शिक्षणासाठी टप्प्याटप्प्याने मदत
मुलीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध टप्प्यांवर आर्थिक मदत दिली जाते. मुलीच्या जन्मानंतर ५,००० रुपये दिले जातात. त्यानंतर ती पहिलीत गेल्यावर ६,००० रुपये, सहावीत गेल्यावर ७,००० रुपये आणि अकरावीत प्रवेश घेतल्यावर ८,००० रुपये दिले जातात. या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.
१८ वर्षांनंतर मोठा लाभ
मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिला एकरकमी ७५,००० रुपये दिले जातात. अशा प्रकारे या योजनेतून एकूण सुमारे १ लाख १ हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळते. त्यामुळे मुलींच्या उच्च शिक्षणासाठी किंवा भविष्यासाठी ही मोठी मदत ठरते.
मुलींच्या सक्षमीकरणाकडे मोठे पाऊल
‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ ही केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नसून मुलींच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचा उपक्रम ठरत आहे. या योजनेमुळे समाजात मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होत आहे.
