राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. आज सोमवारी शरद पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली. त्यानंतर दिल्लीत आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अशोक खरात प्रकरणामध्ये राज्यातील अनेक नेत्यांची नावं समोर आली, याबद्दल विचारले असता शरद पवारांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर भाष्य केलं.
"मी 2-3 ठिकाणी जातो. पंढरपूरला पांडुरंग, तुळजापूरला तुळजाभवानीचं दर्शन घेतो. निवडणुकीवेळी कान्हेरी गावात मारुतीचं दर्शन घेतो पण त्याची जाहिरात करत नाही. आज राज्यात चिंता वाटावी अशी परिस्थिती आहे. खरात बाबानंतर आणखी काही बाबा आले आहे. राज्यात बाबांची गर्दी झाली आहे. एका बाजूला शाहू, फुले, आंबेडकर म्हणायचं आणि दुसरीकडे अशा पद्धतीने लोकप्रतिनिधी या बाबांकडे जातात हे चिंताजनक आहेत. कुणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलं, त्यात अनेकांची नावं आहेत. त्यात राजकीय पक्षात स्थान भुषवणारे लोक आहेत', असं म्हणत शरद पवार यांनी खरात प्रकरणात राजकीय नेत्यांच्या सहभागावर चिंता व्यक्त केली.
advertisement
अजितदादांच्या अपघाताची चौकशी व्हावी का?
"रोहित पवार यांनी अभ्यास केला होता म्हणून ते बोलत आहेत. माझ्याकडे अधिकृत माहिती नाहीये .8.30 - 9 वाजता अजित पवार यांचं विमान रनवे पासून बाजूला जाऊन अपघात झाला. त्यानंतर मी हेलिकॉप्टर ने गेलो आणि लँड झालो. हा अपघात असावा अस माझं प्राथमिक मत आहे. पण रोहित यांनी आरोप करताना काही अभ्यास केला आहे म्हणून ते बोलत आहेत .CBI चौकशी करण्याची रोहित पवार मागणी करत आहेत, त्याबाबत सरकारला विचारावा लागेल', असंही पवार सांनी सांगितलं.
सुनेत्रा पवारांना राष्ट्रवादीचा पाठिंबा
'बारामती पोटनिवडणुकीमध्य उमेदवार देणं हा त्या पक्षाचा विषय आहे. काँग्रेस एक राजकीय पक्ष आहे, तो त्यांचा अधिकार आहे, त्यावर फार चर्चा करण्याची गरज नाही. बिनविरोध करा अस म्हणायचं पण काही कारण नाही. लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. काँग्रेसला बोलण्याची काय गरज आहे, राजकारणात येणारी लोक लोकांची काम करण्यासाठी येतात, अजित पवार लोकांची काम करत होते. त्यांचा आदर आहे, हे मान्य केलं आहे ते जाण्याचं दुःख कुटुंब म्हणून आम्हाला सगळ्यांना आहे. कुटुंबात एक पद्धत आहे, कुटुंब प्रमुख त्याची बाकीची भूमिका मांडली जाते, ती राजकीय नसते. आज ती जबाबदारी माझी होती. त्यामुळे आम्ही ठरवलं आपल्याकडून उमेदवारी द्यायची नाही. आता समोर कुणीतरी लढेल हे मान्य करूनच निवडणुकीत उभं राहावं लागतं, असं म्हणत पवारांनी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली.
