संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आरोपाखाली गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून वाल्मिक कराडसह त्याची आठ जणांची गँग बीडच्या तुरुंगात आहे. याच तुरुंगात बबन गिते याचे समर्थक कैदीही आहेत. पूर्वीच्या राजकारणात दोन्ही गँगमध्ये बऱ्याचदा राजकारणावरून चकमकी उडाल्या होत्या. तसेच अनेक मुद्द्यांवर त्यांचे मतभेद होते. हेच मतभेद आजच्या वादावादीला कारणीभूत ठरल्याचे सांगितले जाते. परंतु बबन गिते एका खून प्रकरणात फरार असूनही त्याच्या समर्थक कैद्यांनी वाल्मिक कराडच्या कानशिलात कशी लगावली? असा प्रश्न उपस्थित होत असताना यानिमित्ताने कराड-गिते यांच्यातील गँगमध्ये भडका उडाल्याचेही सांगितले जाते.
advertisement
बबन गिते कोण आहे? त्याची राजकीय आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी काय आहे?
कराडला झालेल्या मारहाणीनंतर बबन गिते कोण आहे? त्याची राजकीय आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी काय आहे? परळीच्या राजकारणात त्याचे स्थान काय आहे? याची महाराष्ट्रात जोरदार चर्चा होत आहे. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटासोबतचे त्याचे कनेक्शनही चर्चेत आहे.
बबन गिते याचा परळीच्या राजकारणात मोठा दबदबा
बबन गिते हा परळीच्या राजकारणातील महत्त्वाचा पुढारी आहे. स्थानिक राजकारणात त्याचा चांगलाच दबदबा आहे. वंजारी जातीतून येत असल्याने समाजाची ताकदही त्याच्या मागे मोठी आहे. परळीत त्याला मानणारा वर्गही मोठा आहे. त्याची पत्नी परळी पंचायत समितीची विद्यमान सदस्य आहे. त्याआधी त्याची पत्नी परळी पंचायत समितीची सभापती देखील राहिली आहे. एकंदरित स्थानिक राजकारणात त्याचे वजन यावरून दिसून येईल.
धनंजय मुंडे यांना पर्याय म्हणून बबन गितेकडे पाहिले गेले, पवारांच्या राष्ट्रवादीत जंगी प्रवेश झाला
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या गटात गेल्यानंतर त्यांना पर्याय म्हणून बबन गितेचे नाव समोर येऊ लागले. बबन गिते यानेही परळीत आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे बबन गितेने ठरवले. विधानसभा निवडणूक लागायला काही महिने शिल्लक असताना ७०० गाड्यांचा ताफा घेऊन प्रवेशासाठी तो मुंबईला आला. एवढ्या गाड्यांचा ताफा आणि त्याच्या मागे असलेली समर्थकांची संख्या पाहून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेही डोळे विस्फारले. शरद पवार आणि जयंत पाटील यांनी बबन गितेला बळ देण्याचे ठरवले. धनंजय मुंडे यांना पर्याय म्हणून त्यांचे चेहरा प्रोजेक्ट करण्याचे राष्ट्रवादी पवार गटाचे नियोजन होते.
बापू आंधळे यांचा खून झाला तेव्हापासून बबन गिते फरार, अद्याप समोर आला नाही
परंतु त्याच काळात मरळवाडीचे सरपंच, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बापू आंधळे यांचा खून झाला. भर दिवसा त्यांची गोळ्या झाडून हत्या झाली. त्यांच्या खुनाचा आरोप बबन गिते यांच्यावर ठेवण्यात आला. बबन गिते याच्यासह मुकुंद गिते, महादेव गिते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून बबन गिते अद्याप समोर आलेला नाही, तो फरार आहे.
