जागतिक बाजारपेठेतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोने आणि चांदीच्या 'बेस इम्पोर्ट प्राईस' (Base Import Price) मध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सर्राफा बाजारासह गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, येणाऱ्या काळात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काय झाला बदल?
सरकारने चांदीची बेस इम्पोर्ट प्राईस २,८२० डॉलर प्रति किलोवरून थेट २,४२७ डॉलर इतकी कमी केली आहे. याचाच अर्थ भारतीय चलनात चांदीच्या आधारभूत किमतीत जवळपास ३६,७०० रुपयांची मोठी घट झाली आहे. त्याचप्रमाणे, सोन्याची बेस प्राईस देखील १,६५२ डॉलर प्रति १० ग्रॅमवरून १,५२६ डॉलर करण्यात आली आहे, ज्यामुळे सोन्याच्या किमतीत सुमारे ११,७०० रुपयांची कपात दिसून येत आहे.
advertisement
सामान्य ग्राहक आणि गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
'बेस इम्पोर्ट प्राईस' म्हणजे ती किंमत ज्यावर सरकार 'इम्पोर्ट ड्युटी' (आयात शुल्क) मोजते. ही किंमत कमी झाल्यामुळे आता आयातदारांना सोने-चांदी मागवण्यासाठी कमी टॅक्स द्यावा लागेल. याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारपेठेवर होऊन सोनं-चांदीच्या किमती स्थिर राहण्यास किंवा कमी होण्यास मदत होऊ शकते. लग्नसोहळे आणि सणासुदीच्या हंगामापूर्वी घेतलेला हा निर्णय ज्वेलरी उद्योगासाठी आणि सर्वसामान्य ग्राहकांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
बाजारपेठेचे गणित
तज्ज्ञांच्या मते, बेस प्राईस कमी झाल्यामुळे बाजारात लगेच मोठी घसरण दिसेलच असे नाही, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भाव, डॉलर-रुपया विनिमय दर आणि मागणी यांसारख्या अनेक गोष्टींवर अंतिम दर अवलंबून असतात. मात्र, दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरू शकते.
