आईच्या पुण्यतिथीला पूर्ण केली शेवटची इच्छा
गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील जीरा नावाच्या गावातील मूळचे असलेले आणि सध्या सुरतमध्ये वास्तव्यास असलेले उद्योजक बाबूभाई जिरावाला यांनी आपल्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त शेतकऱ्यांचं कर्ज फेडण्याचा ध्यास घेतला. त्यांनी स्वतःच्या गावातल्या 290 गरजू शेतकऱ्यांचे बँक कर्ज फेडण्यासाठी 90 लाख रुपये दान केले. त्यांच्या या कृतीने गावातील सर्व शेतकरी कर्जमुक्त झाले आणि संपूर्ण गावात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
advertisement
घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांच्या नावावर चुकीचे कर्ज
जीरा गावात १०० वर्षांपूर्वी 'सेवा सहकारी समितीची' स्थापना करण्यात आली होती. मात्र, १९९० च्या दशकात एका घोटाळ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या नावावर चुकीच्या पद्धतीने कर्ज दाखल झाले होते. यामुळे शेतकरी खूप त्रस्त होते. त्यांनी बँकेविरोधात आंदोलनही केले होते आणि हा कायदेशीर वाद अनेक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित होता. या कर्जाच्या बोजामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्जही मिळत नव्हते, ज्यामुळे त्यांची शेतीची कामे थांबली होती. सुरतमधील रिअल इस्टेटचे मोठे व्यावसायिक बाबूभाई जिरावाला यांनी आपल्या गावातील शेतकऱ्यांची ही अनेक वर्षांपासूनची ही असलेली अडचण समजून घेतली आणि आपल्या आईला खरी श्रद्धांजली देण्याचा निश्चय केला.
"आईची इच्छा होती, दागिने विकून गावासाठी काहीतरी करावं..."
बाबूभाई जिरावाला यांनी या भावना व्यक्त करताना सांगितले की, "माझ्या गावातील २९० शेतकरी बांधवांचे १९९५ पासून बँकेच्या कर्जाचे प्रकरण प्रलंबित होते. यामुळे त्यांना नवीन कर्ज मिळणे बंद झाले होते, ज्यामुळे ते खूप त्रस्त होते." त्यांनी पुढे आईच्या इच्छेचा उल्लेख करताना सांगितले, "माझ्या आईची इच्छा होती की, माझ्याकडे जे काही दागिने आहेत, ते विकून गावासाठी काहीतरी चांगले करावे. हे दागिने विकून गावातील शेतकऱ्यांचे बँकेचे कर्ज फेडावे."
Success Story : 16 व्या वर्षी लग्न, सासरच्यांकडून मारहाण, आयुष्य संपवण्यापर्यंत पोहोचली, अन् एका गोष्टीनं बदललं आयुष्य
आईची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी बाबूभाईंनी त्वरित भावनगर बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि सर्व शेतकऱ्यांचे थकीत कर्ज भरण्याची तयारी दर्शवली. बँकेच्या अधिकाऱ्यांनीही त्यांच्या या सामाजिक आणि मानवीय उपक्रमाचे स्वागत केले.
शेतकऱ्यांना मिळाले 'नो कर्ज सर्टिफिकेट'
बाबूभाईंनी त्यांचे भाऊ आणि बँक अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली इच्छा पूर्ण केली. शेतकऱ्यांवर असलेले एकूण ९० लाख रुपयांचे कर्ज त्यांनी भरले. यानंतर त्यांनी बँकेकडून सर्व शेतकऱ्यांच्या नावावर 'नो कर्ज सर्टिफिकेट' (कर्ज नाही प्रमाणपत्र) मिळवले.
गावात आयोजित केलेल्या एका समारंभात बाबूभाईंनी स्वतः हे प्रमाणपत्र सर्व शेतकऱ्यांना वाटले. "आज मला आणि माझ्या कुटुंबाला खूप आनंद आणि समाधान आहे की आम्ही आईची इच्छा पूर्ण केली आणि त्यांना खरी श्रद्धांजली दिली," असे बाबूभाईंनी अभिमानाने सांगितले. आईच्या इच्छेखातर ९० लाख रुपयांचे दान करून बाबूभाई आज आधुनिक युगातील 'श्रावणबाळ' ठरले आहेत, ज्यांनी आपल्या माणुसकीने संपूर्ण गावाला कर्जमुक्त केले.
