बँकेतच झाली घरफोडी कर्मचाऱ्यांनीच लावला चुना
बँकेचे एमडी आणि सीईओ व्ही. वैद्यनाथन यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, हा घोटाळा चंदिगढमधील केवळ एका शाखेपुरता मर्यादित आहे. बँकेच्या काही कर्मचाऱ्यांनी बाहेरच्या व्यक्तींशी हातमिळवणी करून हा कारनामा केला. बँकेची 'मेकर-चेकर' ही सुरक्षा यंत्रणा असतानाही, बनावट संमती पत्रे आणि खोट्या स्वाक्षऱ्यांच्या जोरावर या कर्मचाऱ्यांनी ५९० कोटी रुपये बँकेबाहेरील इतर खात्यांमध्ये वळवले.
advertisement
फॉरेन्सिक ऑडिटसाठी KPMG ची नियुक्ती
घोटाळा उघडकीस येताच बँकेने तातडीने पावले उचलली आहेत. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी जागतिक दर्जाची ऑडिट संस्था KPMG ची नियुक्ती करण्यात आली आहे. नेमकी चूक कुठे झाली? इलेक्ट्रॉनिक व्यवहारांऐवजी मॅन्युअल पद्धतीने चेक क्लिअर करून ही फसवणूक करण्यात आली आहे. पैसा परत मिळणार का? ज्या खात्यांमध्ये ही रक्कम गेली आहे, त्या बँकांना आयडीएफसीने संपर्क केला असून ती खाती गोठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे खात्यावर पैसे काढता येणार नाहीत. या घोटाळ्यामुळे शेअर मार्केटमध्येही खळबळ उडाली आहे.
बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाचे...
हा प्रकार सिस्टममधील दोषामुळे झाला नसून मानवी हस्तक्षेपामुळे झाला आहे, असे बँकेने स्पष्ट केले आहे. "बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत असून या फटक्यामुळे बँकेच्या कामकाजावर परिणाम होणार नाही," असा विश्वास सीईओ वैद्यनाथन यांनी व्यक्त केला आहे. मात्र, सरकारी खात्यावरच डल्ला पडल्याने आता या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून दोषींवर कडक फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
