जागतिक स्तरावर पश्चिम आशियातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या बाजारातील अनिश्चितता वाढत असताना भारतासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. ऑईल इंडिया लिमिटेडने (OIL) राजस्थानच्या थार वाळवंटातून कच्च्या तेलाच्या उत्पादनात मोठी झेप घेत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या यशामुळे भारताचे परकीय तेलावरील अवलंबित्व कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.
advertisement
विक्रमी ७० टक्क्यांची वाढ
ऑईल इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोधपूर सँडस्टोन फॉर्मेशनमधून दररोज १,२०२ बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन घेण्यात आले आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ७०५ बॅरल होते, म्हणजेच उत्पादनात तब्बल ७० टक्क्यांची भरघोस वाढ झाली आहे. देशांतर्गत ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.
अत्याधुनिक 'CSS' तंत्रज्ञानाची जादू
थार वाळवंटातील हे यश सहज मिळालेले नाही. येथील कच्चे तेल अत्यंत घट्ट (Viscous) असल्याने ते बाहेर काढणे मोठे आव्हान होते. मात्र, ऑईल इंडियाने सायक्लिक स्टीम स्टिम्युलेशन (CSS) या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला. हे एक थर्मल एन्हांस्ड ऑईल रिकव्हरी तंत्रज्ञान आहे, ज्याद्वारे जमिनीखालील घट्ट तेल पातळ करून ते उपसले जाते. याशिवाय 'फिशबोन ड्रिलिंग' सारख्या तंत्राचा वापर भारतात पहिल्यांदाच येथे करण्यात आला आहे.
उत्पादनाचा प्रवास: वाळवंट ते रिफायनरी
जैसलमेरच्या 'बागेवाला' फील्डमधून काढलेले हे तेल टँकर्सद्वारे गुजरातच्या मेहसाणा येथील ONGC केंद्रात पाठवले जाते. तिथून पाईपलाईनद्वारे ते IOCL च्या कोयली रिफायनरीपर्यंत पोहोचते. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये राजस्थान फील्डमधून एकूण ४३,७७३ मेट्रिक टन उत्पादन झाले आहे, जे मागील वर्षी ३२,७८७ मेट्रिक टन इतके होते.
का महत्त्वाचे आहे हे यश?
बागेवाला फील्ड हे भारतातील अशा दुर्मिळ क्षेत्रांपैकी एक आहे जिथे 'हेवी ऑईल' मिळते. १९९१ मध्ये शोध लागलेल्या या क्षेत्रात सध्या ३३ विहिरी कार्यरत आहेत. रशिया-युक्रेन किंवा मध्य-पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जेव्हा तेलाचे भाव वाढतात, तेव्हा अशा स्वदेशी स्त्रोतांमुळे देशाला मोठा आर्थिक आधार मिळतो. त्यातच आता उत्पादन वाढल्यानं बाजारात इंधन पुरवठा आणखी होणार आहे.
