गिरीश खत्री यांनी लहानपणापासूनच कष्टाचे महत्त्व ओळखले. आठवीत असतानाच त्यांनी आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहिली. वडिलांनी कर्ज काढून घर बांधले होते आणि घरात पैशाची चणचण होती. त्या काळात गिरीश यांच्या मनात छोटासा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना आली. सुरुवातीला त्यांनी भेळीची गाडी लावण्याचा विचार केला, पण आईने आणि वडिलांनी त्यांना मामाकडून आईस्क्रीमचा व्यवसाय शिकण्याचा सल्ला दिला.
advertisement
वार्षिक परीक्षा संपल्यानंतर त्यांनी मामाकडे जाऊन आठ दिवसांतच आईस्क्रीम बनवण्याची कला शिकली. काही फॅमिली फ्रेंड्सकडून त्यांनी फक्त 250 रुपये उसने घेतले आणि त्यातून पाच लिटर मँगो आईस्क्रीम तयार करून विक्रीस सुरुवात केली. पहिल्याच दिवशी विक्री फक्त 9 रुपयांची झाली. पण खत्री यांनी हार मानली नाही. त्यांनी सतत प्रयोग करत आईस्क्रीमच्या चवीत सुधारणा केली आणि शेवटी एक असा खास फॉर्म्युला तयार झाला ज्यामुळे ग्राहक पुन्हा पुन्हा त्यांच्या आईस्क्रीमसाठी येऊ लागले.
सुरुवातीला घरगुती पातळीवर सुरू झालेला हा व्यवसाय हळूहळू वाढत गेला. लोकांच्या तोंडी प्रसिद्धीमुळे ग्राहकवर्ग वाढत गेला आणि खत्री बंधू हे नाव गुणवत्तापूर्ण आणि घरगुती चवीच्या आईस्क्रीमसाठी ओळखले जाऊ लागले. आज या व्यवसायाच्या महाराष्ट्रभर 29 शाखा आहेत.
सध्या खत्री बंधूंकडून सुमारे 26 प्रकारचे आईस्क्रीम फ्लेवर्स तयार केले जातात. यामध्ये मँगो, मावा, गुलकंद, स्ट्रॉबेरी, अंजीर, केशर, बटरस्कॉच, पिस्ता, जांभूळ आणि पेरू असे अनेक आकर्षक स्वाद आहेत. तर मस्तानीमध्ये मँगो, मावा, चॉकलेट आणि स्ट्रॉबेरीसह एकूण 13 प्रकार ग्राहकांना उपलब्ध आहेत.
आज खत्री बंधूंचा व्यवसाय आधुनिक यंत्रसामग्री, स्वच्छता आणि दर्जेदार साहित्य यावर आधारित आहे. तरीही त्यांनी पारंपरिक चव टिकवून ठेवली आहे. त्यांच्या प्रत्येक आउटलेटवर घरगुती पद्धतीची गोडी आणि माणुसकीची ऊब जाणवते.
गिरीश खत्री सांगतात, आज आम्ही कोटींचा व्यवसाय करतो, पण सुरुवात केवळ काही रुपयांत झाली होती. त्या काळात ग्राहकांचा विश्वास मिळवणं हेच सर्वात मोठं भांडवल ठरलं. मेहनत, सातत्य आणि प्रामाणिकपणा असेल तर कोणताही व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. आज खत्री बंधू पॉट आईस्क्रीम आणि मस्तानी हे नाव केवळ ब्रँड नसून मेहनतीने घडवलेल्या यशाचे प्रतीक आहे. त्यांच्या यशाने असंख्य तरुण उद्योजकांना प्रेरणा दिली आहे की लहानशी सुरुवातदेखील मोठे स्वप्न साकार करू शकते फक्त चिकाटी आणि मेहनत असावी लागते.