पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज सिंग यांनी 15 डब्ब्यांच्या लोकलच्या फेऱ्या वाढवण्याबद्दलची घोषणा केली आहे. 15 डब्ब्यांच्या लोकल चालवण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून 12 डब्ब्यांच्या लोकलमधील डब्बे काढून ते 15 डब्ब्यांच्या लोकलसाठी जोडले जात होते. परंतू प्रवाशांकडून 15 डब्ब्यांच्या लोकलची मागणी दिवसागणिक वाढू लागल्यामुळे आता पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इतर लोकलची जोडणी न करता थेट 15 डब्ब्यांची लोकलच आता पश्चिम रेल्वेवर धावणार आहे.
advertisement
प्रवाशांच्या मागणीनुसार, चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये, 15 डब्ब्यांच्या लोकलची मागणी करण्यात आली होती. मागणीचा वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आता अखेर प्रवाशांच्या सेवेमध्ये लवकरच 15 डब्बा लोकल दाखल होतेय. सध्याच्या घडीला अंधेरी ते विरार दरम्यान, 15 डब्ब्यांची लोकल धावत आहे. आता त्याच लोकलचा विस्तार बांद्रा रेल्वे स्थानकापर्यंत करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने इतरत्र रेल्वे स्थानकांच्याही विस्ताराची कामे हाती घेण्यात आले आहे.
वांद्रा ते अंधेरी दरम्यानच्या स्थानकांच्या विस्तारांची कामे, रुळांची कामे, ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेबद्दलची कामे हाती घेण्यात आले आहे. ही सर्व कामे डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन नजरेसमोर ठेवण्यात आले आहे. त्यानंतरच वांद्रे ते अंधेरी मार्गावर 15 डब्ब्यांची लोकल चालवली जाणार आहे.
