आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीत राजीनामा सत्र सुरू असल्याचे पाहायला मिळाले आहे.
वॉर्ड क्रमांक 193 साठी पुन्हा एकदा हेमांगी वरळीकर यांनाच संधी दिली जाणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर आपण नाराज झाल्याचे सूर्यकांत कोळी यांनी स्पष्ट केले आहे. अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करूनही संधी न मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली असून, कार्यकर्त्यांमध्ये असलेली अस्वस्थता आता उघडपणे समोर येत असल्याचे चित्र आहे.
advertisement
वरळीत राजीनामा सत्र
कोळी यांच्या राजीनाम्यानंतर वरळी मतदारसंघात असलेल्या इतर शाखा प्रमुखांमध्येही असंतोष पसरल्याचे दिसून येत आहे. उमेदवारी ठरवताना स्थानिक कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा आरोप काही पदाधिकाऱ्यांकडून केला जात असून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आशिष चेंबूरकर यांनीही त्यांच्या पत्नीसाठी तिकीट मागितल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या मागणीमुळे इतर इच्छुक आणि पदाधिकारी अस्वस्थ झाले असून, पक्षाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास आणखी काही जण राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
आदित्य ठाकरेंची डोकेदुखी वाढली
वरळी हा शिवसेनेसाठी (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. आमदार आदित्य ठाकरे यांचा हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असताना, अशा प्रकारची अंतर्गत नाराजी पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकते. स्थानिक पातळीवरील असंतोष वेळीच दूर केला नाही, तर त्याचा परिणाम निवडणुकीत दिसून येण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले सूर्यकांत कोळी
मी सूर्यकांत कोळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्रमांक १९३ चा शाखाप्रमुख आपणांस नम्र निवेदन करू इच्छितो की मी गेली ४४ वर्षे पक्षाचा प्रामाणिक,स्वच्छ, मेहनती कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे, तसेच गेली १७ वर्षे शाखाप्रमुख म्हणून कार्यरत आहे. साहेब आदित्य साहेब आमचे आमदार आहेत, पक्षाची प्रतिमा मलिन होणे माझ्या रक्तात बसत नाही. पक्षाचे काम करीत असताना अनेक अडचणी आल्या मला नेहमी अंधारात ठेवून नगरसेविका हेमांगी वरळीकर व तिचा पती हरीश वरळीकर हेच शाखेचे सर्वस्व असे मिरवत असायचे. मला कधीच कोणत्याही कामाला ह्यांनी पैसे दिले नाहीत फक्त सर्व माध्यमातून पैसे गोळा करण्याचे
काम या हरीश वरळीकरने केले आहे. फंडच्या फंड गिळंकृत केले आहेत. जो कोणी विरोधात बोलेल त्या शिवसैनिकांना मारहाण करणे, शाखाप्रमुखांच्या घरावर दगडफेक करणे, शाखाप्रमुखांना घाणेरड्या केसेस मध्ये फसवणे हा हरीश वरळीकरांचा हातखंड आहे. अनधिकृत बांधकामांचे एवढे पैसे हे हरीश वरळीकर घेतात कि संपूर्ण समुद्र किनारा डेब्रिज ने भरून गेला आहे आणि त्याला खतपाणी आशिष चेम्बुरकर यांनी दिले आहे, वारंवार तक्रारी करून सुद्धा काही परिणाम झाला नाही उलट शाखेकडून कार्यकर्त्याने पाठ फिरवली. दहा वर्षात साधी शाखेची पूजा देखील ह्यांनी घातली नाही. शाखेची होत चाललेली पडझड ह्या सर्वांची जाणीव आदरणीय आदित्य साहेबांना आहे. शाखेची एकंदरीत परिस्थिती फार नाजूक आहे अनधिकृत बांधकामे, रस्त्याची झालेली
दुरावस्था, ह्या सर्व कारणांमुळे वॉटर मीटर गटर ह्यावर परिणाम होऊन सर्व जनता ह्या सर्व कारणांमुळे
विरोधात गेली आहे, सर्व निरीक्षकांनी देखील ह्यांच्या विरोधात रिपोर्ट दिले आहेत ह्या सर्वांची मी जबाबदारी घेऊ शकत नाही ह्या सर्व चुकीच्या मार्गाची जबाबदारी हरीश वरळीकर ह्यांचीच आहे. तरी महोदय आपण पुन्हा ह्यांनाच सीट देणार असाल तर माझ्या शाखाप्रमुख पदाचा तसेच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा स्वीकारावा हि नम्र विनंती, माझ्याकडून पक्षसेवेत कार्य करित असताना काही कमी राहिली असेल तर साहेब माफ करा, आपल्या पक्षाकडून खूप प्रेम आणि नाव मिळाले हे मी कदापिही विसरू शकत नाही.
राजीनाम्यांचे सत्र थांबवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली
दरम्यान, पक्ष नेतृत्वाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, वाढती नाराजी आणि राजीनाम्यांचे सत्र थांबवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे. पुढील काही दिवसांत या नाराजीवर पक्ष कसा तोडगा काढतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
